‘मुंबई आय’ प्रकल्प वांद्रेबाहेर जाणार!

‘मुंबई आय’ प्रकल्प वांद्रेबाहेर जाणार!

मुंबई, ता. १ : शहराच्या सौंदर्यात भर घालणारा ‘मुंबई आय’ प्रकल्प वांद्रे रेक्लेमेशनमध्ये साकारण्यात येणार होता; परंतु त्या जागेला स्थानिक आमदार आशीष शेलार यांच्यासह वांद्र्यातील नागरिकांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर आता प्रकल्पाची जागा बदलण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तशा आशयाचे ट्विट आशीष शेलार यांनी केले आहे.

‘मुंबई आय’ प्रकल्पाची उभारणी एमएमआरडीए करत आहे. ‘लंडन आय’च्या धर्तीवर तो उभारण्यात येत आहे. वांद्रे रेक्लेमेशनमध्ये प्रकल्पाच्या उभारणीपूर्वी वाहतुकीच्या दृष्टीने आणि पर्यावरणीय पैलूंचा अभ्यास करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. प्रकल्पाच्या सल्लागार नियुक्तीसाठीही एमएमआरडीएने निविदा काढली होती. मात्र, त्यामध्ये आता बदल करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. आमदार आशीष शेलार यांनीही वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ‘मुंबई आय’ प्रकल्प वांद्रे रेलक्लेमेशनमध्ये अडचणीचा ठरत असल्याने त्याला विरोध दर्शविला होता. आता तो प्रकल्प वांद्र्यातून इतरत्र हलविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे. ‘मुंबई आय’ प्रकल्पामुळे परिसरात वाहतूक कोंडी होईल. शांतताही भंग होणार असल्याने पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही ‘मुंबई आय’ प्रकल्प इथे नको, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दोन हजार कोटी अपेक्षित खर्च
- मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच पर्यटनवाढीला चालना मिळण्याच्या उद्देशाने ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ प्रकल्पाची एमएमआरडीएने घोषणा केली होती. वांद्रे रेक्लेमेशनमध्ये त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे.
- सुमारे १५० व्यासाचे जायंट व्हिल ‘मुंबई आय’ प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करील.
- ‘मुंबई आय’ प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. त्याकरिता अंदाजे दोन हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. मात्र, आता नवीन जागेच्या शोधामुळे प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

ट्विट
मी आणि स्थानिक नागरिक संघटनांचा सततचा पाठपुरावा आणि विरोधानंतर एमएमआरडीएने आमच्या मागण्या मान्य केल्या. वांद्रे रेक्लेमेशनच्या जागेवरून ‘मुंबई आय’ हटविले! आशा आहे की, एमएमआरडीए जी पर्यायी जागा शोधेल ती मोठ्या प्रमाणात रहदारी आणि प्रस्तावित पर्यटनस्थळाला भेट देणाऱ्या नागरिकांची गर्दी हाताळू शकेल!
- आशीष शेलार, आमदार

२०२० पासून आम्ही ‘मुंबई आय’ प्रकल्प वांद्रे रेक्लेमेशनमध्ये नको म्हणून एमएमआरडीएकडे पत्रव्यवहार करत होतो. वांद्र्यात वाहनतळासाठी पुरेशी जागा नाही. ना वाहतुकीचे इथे कोणतेही नियोजन होऊ शकले असते. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही प्रकल्प इथे नको, अशी आमची भूमिका होती.
- विद्या वैद्य, वांद्रे रेक्लेमेशन एरिया व्हॉलेंटिअर ऑर्गनायझेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com