
हल्ला झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू
वज्रेश्वरी, ता. १ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील अकलोली कुंड या ठिकाणी रात्रीच्या सुमारास वैयक्तिक राग मनात ठेऊन तरुणावर जीवघेणा हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न झाला होता. ही घटना चार दिवसांपूर्वी गणेशपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा गुरुवारी (ता. १) मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आरोपींवर गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी वज्रेश्वरी येथील साहिल खेडेकर, हरी नेपाळी, कृषीकेश भोसले, विराज क्षीरसागर, अनुराग बिर्जे, दर्शन बिर्जे, शिवम बिर्जे यांच्यासह इतर दहा-बारा जणांनी प्रणयवर प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी त्याची प्रकृती अत्यवस्थ होऊन त्याचा मृत्यू झाला. तपास गणेशपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके करत आहेत.