रेल्वे, बस थांबे सर्वच दूर, पुरेसे पाणीही नाही!
 
संक्रमण शिबिरातील गैरसोयींमुळे बीडीडी प्रकल्पग्रस्त हैराण

रेल्वे, बस थांबे सर्वच दूर, पुरेसे पाणीही नाही! संक्रमण शिबिरातील गैरसोयींमुळे बीडीडी प्रकल्पग्रस्त हैराण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : शिवडी येथील संक्रमण शिबिरात वास्तव्यास असणाऱ्या बीडीडी चाळीतील नागरिक गैरसोयींमुळे हैराण झाले आहेत. शिवडी संक्रमण शिबिरांपासून भाजी बाजार, रेल्वे स्थानक, बस थांबे दूर अंतरावर आहेत. येथे पुरेशा पाण्याची व्यवस्थाही नाही. म्हाडा आणि मुंबई महापालिकाही येथील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याने संतापात भर पडली आहे. शिवडीच्या संक्रमण शिबिरातील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.

म्हाडाअंतर्गत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे वरळी, नायगाव, डिलाईन रोड या भागातील बीडीडी चाळीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना शिवडीतील संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. ज्यांना संक्रमण शिबिरात जायचे नसेल, त्यांना घरभाडे देण्यात येते; मात्र या संक्रमण शिबिरांत नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असताना या भागात सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या कामांमुळे चिखल आणि तुंबलेल्या पाण्याचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

नागरिक सातत्याने म्हाडा आणि पालिकेकडे पत्रव्यवहार करत आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनाही समस्यांबद्दल अवगत करत आहेत; मात्र अद्याप कोणाकडूनही या समस्यांवर तोडगा निघाला नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या ठिकाणी किमान पर्यायी व्यवस्था उभारण्यात यावी, अशी मागणी शिबिरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

‘जे गेले त्यांची गैरसोय’
‘आम्हाला घरे खाली करण्यासाठी घाई केली. आम्हाला सांगण्यात आले, की संक्रमण शिबिरात तुम्हाला २४ तास पाणी, वीज आणि स्वच्छता असेल; मात्र येथे पाण्याची मोठी गैरसोय आहे. घरापासून बाजार दूर आहे, ट्रेन, बस या व्यवस्थाही नाहीत. त्यामुळे या संक्रमण शिबिरात कोणीही नागरिक जात नाही. जे गेले त्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे,’ असे संक्रमण शिबिरात राहणाऱ्या गृहस्थाने सांगितले.

दोन्हींकडून उडवाउडवी...
‘मी नायगावमध्ये १७ बीमध्ये राहत होतो. गेल्या वर्षी दिवाळीत आम्ही संक्रमण शिबिरात स्थलांतरित झालो. आम्हाला तेव्हा सांगण्यात आले, की तिथे २४ तास पाणी असेल. आम्ही तिथे गेल्यावर केवळ एक महिना दोन तास पाणी मिळाले; मात्र आता पाण्याचा अत्यंत तुडवडा आहे. पाण्याचा साठा होत नाही, अशी उत्तरे म्हाडाकडून मिळतात. पालिकेवाले म्हणतात, की तुम्हाला इतकाच पाणीपुरवठा करण्यात येईल. दोन्ही प्रशासन उडवाउडवी करत आहेत,’ असे शिवडी संक्रमण शिबिर इमारत क्र. ५ सी या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com