मेट्रोच्या उत्तनपर्यंत विस्ताराला गती मिळणार

मेट्रोच्या उत्तनपर्यंत विस्ताराला गती मिळणार

Published on

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये मेट्रो मार्गाचा उत्तनपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र त्यासंदर्भात एमएमआरडीएकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. दुसरीकडे मोर्वा गावातील कारशेड उत्तनमधील सरकारी जागेवर स्थलांतरित करण्याचाही निर्णय सरकार पातळीवर झाला आहे. त्याबाबतही एमएमआरडीएकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही. या दोन्ही प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येतील, असे आश्वासन एमएमआरडीएच्या आयुक्तांनी दिले.

भाईंदर पश्चिम येथील मोर्वा गावापर्यंत जाणारी मेट्रो पुढे उत्तनपर्यंत वाढवण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्याचप्रमाणे मोर्वा गावातील शेतकऱ्यांनी मेट्रोच्या कारशेडला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे कारशेड स्थलांतर करून ती कोपरा गावातील सरकारी जागेवर स्थलांतर करावी, अशी मागणीही सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली होती. या दोन्ही मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली होती.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एप्रिल महिन्यात मिरा-भाईंदरमध्ये आले असता, मेट्रोचा विस्तार उत्तनपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी जाहीर केले होते; परंतु कारशेड व मेट्रोचा उत्तनपर्यंतचा विस्तार या दोन्ही विषयांवर एमएमआरडीएकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. या विषयांवर एमएमआरडीएसोबत नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. कारशेडच्या जागेचे महसूल विभागाकडून भूसंपादन करून कारशेडच्या कामाची निविदा, तसेच मेट्रोच्या उत्तनपर्यंत विस्ताराच्या वाढीव कामाची निविदा काढून कामाला सुरुवात करावी, अशी विनंती सरनाईक यांनी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांना केली. त्यावर दोन्ही कामांची आवश्यक ती प्रक्रिया एमएमआरडीएकडून सुरू केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. या बैठकीला आमदार गीता जैन उपस्थित होत्या.

कारशेडची निविदा रखडली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरा गावातील सरकारी जागेची तपासणी करण्याचे आदेशही महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार त्याठिकाणी कारशेड उभारण्याची निविदा मे महिन्यात जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र एमएमआरडीएकडून त्यावर अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही.

नवीन मेट्रो मार्गासाठी लवकरच मंजुरी
मेट्रो-४ व मेट्रो-९ ला जोडणारा गायमुख ते काशी मिरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक (चेना गाव जोडून) होणाऱ्या नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी देऊन या मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा लवकरच काढण्याचे आश्वासनही संजय मुखर्जी यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.