ठाणे रेल्वेस्थानकातील प्रवाशांची कोंडी फुटणार

ठाणे रेल्वेस्थानकातील प्रवाशांची कोंडी फुटणार

Published on

मुंबई, ता. १८ : मध्य रेल्वेमार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाण्याची ओळख आहे. सध्याच्या स्थितीत ठाणे स्थानकातील प्रवाशांची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आता पाच आणि सहा क्रमांकाच्या फलाटांची रुंदी एक-एक मीटरने वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे मेल-एक्सप्रेस आणि जलद लोकलच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाढत्या गर्दीमुळे ठाणे स्थानकात प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी मध्य रेल्वेने विविध उपाययोजना केल्या आहेत. ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच व सहावरून दररोज अप-डाऊन दिशेने २५० ते ३०० मेल-एक्स्प्रेस जातात. बहुतांश गाड्या याच फलाटांवर थांबतात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या आणि लोकलच्या प्रवाशांची गर्दी होते. ती विभागण्यासाठी मध्य रेल्वेने गेल्या वर्षी अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक सात ते आठवर थांबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फलाट पाच - सहावरील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे; परंतु पूर्णपणे गर्दीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. परिणामी पाच आणि सहा क्रमांकाच्या फलाटांची रुंदी रेल्वे प्रत्येकी एक मीटरने वाढवणार आहे. त्याबाबतचा प्रस्तावही तयार करण्यात आलेला आहे. त्याचे काम प्रत्यक्षात पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापूर्वीच मेल-एक्सप्रेस गाड्यांना सात आणि आठ क्रमांकाच्या फलाटांवर थांबा देण्यास सुरुवात केली. त्याशिवाय आता पाच आणि सहा क्रमांकाच्या फलाटांची रुंदीही वाढविता येणार आहे.
- रजनीशकुमार गोयल, विभागीय व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.