दिव्यात पुनर्वसनाअभावी १५ कुटुंबाचा जीव धोक्यात

दिव्यात पुनर्वसनाअभावी १५ कुटुंबाचा जीव धोक्यात

Published on

दिवा, ता. ३ (बातमीदार) : साबे गावातील सद्‍गृरुकृपा इमारत ही ठाणे महानगरपालिकेकडून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे; मात्र त्‍यांचे पुनर्वसन न झाल्याने पावसाळ्यात या धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
दिव्यातील साबे गावात दहा वर्षांपूर्वी सद्‍गुरुकृपा इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे काम अपूर्ण असून छत नसल्याने पावसाच्या पाण्यामुळे कमजोर झाली आहे. या इमारतीत राहणारे नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. काही दिवसांपूर्वी भिवंडी शहरात झालेल्या घटनेची पुनरावृत्ती साबे गावात होते की काय किंवा तशी दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल या ठिकाणी रहिवासी करत आहेत.
ही इमारत तीन मजल्यांची असून यामध्ये तीस खोल्या आहेत. त्यातील फक्त पंधरा खोल्यांमध्ये कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही कुटुंबे जीव मुठीत घेऊन रोजचा दिवस ढकलत आहेत. तळमजल्यावरील दोन खोल्यांमधील इमारतीच्‍या खांबांचे आणि छताचे सिमेंट निघून लोखंडी सळ्या दिसू लागल्या आहेत. या इमारतीस छत नसल्यामुळे पावसाचे पाणी चारही बाजूंनी गळत असल्याने इमारत मोडकळीस आलेली आहे. या इमारतीस मे महिन्यात ठाणे महापालिकेची धोकादायक इमारत म्‍हणून नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्‍यांना लवकरात लवकर इमारत खाली करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र या इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबत पालिकेकडे कोणतेच धोरण नाही. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. तसेच या इमारतीला अधिकृत वीज आणि पाणीपुरवठाही होत नसल्‍याने जगणे कठीण झाले आहे. या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना साबे विभागप्रमुख नीलेश पाटील यांनी सांगितले. या इमारतीतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा, असे पाटील यांनी पालिकेला लेखी कळवले आहे.

--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.