रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचे भिजत घोंगडे

रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचे भिजत घोंगडे
Published on

प्रकाश पाटील

पश्‍चिम रेल्वेच्या कक्षेत येणारा विरारनंतरचा म्हणजे वैतरणा ते डहाणू हा परिसर सुविधांअभावी दुर्लक्षित राहिलेला आहे. प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे डहाणू परिसरातील प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. वैतरणा, डहाणूतील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचे भिजत घोंगडे आहे.

डहाणू विभागातील प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी रेल्वेमंत्री राम नाईक यांना आंदोलन करावे लागले होते. डहाणू लोकलसाठी ते न्यायिक मार्गाने आंदोलनात उतरले होते. वसई-विरारचे नगरसेवक राजकुमार चोरघे यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानेच डहाणू लोकल सुरू झाली होती; अन्यथा आजही हे काम रखडले असते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे डहाणू विभागातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी पुन्हा न्यायालयात धाव घ्यावी का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. रेल्वे प्रशासन आता प्रवासी संघटना आणि राजकीय लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाही, असे दिसत आहे.

गर्दीच्या वेळी डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, डहाणू येथून सकाळी ७.०५ वाजता सुटणारी लोकल सुरू करावी, बोरिवली येथून डहाणूसाठी लोकलची एक अतिरिक्त फेरी सुरू करावी, मुंबई-नंदुरबार रेल्वेला वैतरणा स्थानकात थांबा देण्यात यावा, लोकशक्ती एक्स्प्रेसचा सफाळे येथील थांबा पुन्हा सुरू करावा, वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या सर्व स्थानकांत एक्सेलेटरची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागण्या प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.

८ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरा-भाईंदर महापालिकेच्या कामगार कर्मचारी सेनेच्या हक्कांसाठी पश्‍चिम रेल्वेच्या विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता. त्यानंतर आमदार मनीषा चौधरी यांनी ८ जून २०२३ रोजी पश्‍चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोककुमार मिश्र यांची चर्चगेट येथील कार्यालयात भेट घेतली. तसेच खासदार राजेंद्र गावित यांनीसुद्धा १६ जून २०२३ रोजी पश्‍चिम रेल्वेचे नीरज वर्मा यांच्या मुंबई सेंट्रल येथील कार्यालयात भेट घेतली होती. या तिन्ही भेटीत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले होते, परंतु आजतागायत एकही मागणी पूर्ण झालेली नाही.

डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने पश्‍चिम रेल्वे दरबारी समस्या मांडत असून संस्थेचे शिष्टमंडळ दिल्ली येथील रेल्वे बोर्डातही २२ एप्रिल २०२२ रोजी भेटले होते. डहाणू लोकल सुरू होऊन १० वर्षे पूर्ण झाली, त्याचे औचित्य साधून वैतरणा ते डहाणूपर्यंतच्या स्थानकातील प्रवाशांची स्वाक्षरी मोहीम पार पाडून ती निवेदने रेल्वे मंत्रालय, रेल्वे अधिकारी आणि राजकीय मंडळींनाही देण्यात आली. तसेच पश्‍चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांच्या अनेक भेटी घेतल्या. या भेटीअंती प्रशासनाची नेहमीच नकारघंटाच असायची; परंतु राजकीय मंडळी भेटी घेतात, तेव्हा सकारात्मक आश्वासने त्यांना दिली जातात. रेल्वे प्रशासन लोकप्रतिनिधींना ‘देखल्या देवास दंडवत’ याप्रमाणे वेळ मारून नेत असावेत, अशी चर्चा प्रवाशांत सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.