दरडग्रस्त भागातील बांधकाम जमीनदोस्त

दरडग्रस्त भागातील बांधकाम जमीनदोस्त

भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : भिवंडी महापालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याठिकाणी नागरिकांनी झोपडी व विटांची कच्ची घरे बांधली आहेत. त्यामुळे डोंगर खचला किंवा दरड कोसळली तर मोठी हानी होऊ नये, यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. प्रभाग समिती क्र.१ चे सहा.आयुक्त सुदाम जाधव यांनी या भागात राहणाऱ्या १० कुटुंबांना स्थलांतरित केले; तर जाधव यांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शुक्रवारपासून गायत्रीनगर, रामनगर आणि नुरीनगर या भागातील दरडीखाली नव्याने बांधकाम केलेले बांधकाम जमीनदोस्त केले आहे. दरडीच्या जवळ राहणाऱ्या घरांची वीज खंडित करून त्यांना स्थलांतरित केले आहे.

भिवंडी शहरात चाविंद्रा, रामनगर, गायत्रीनगर, आझादनगर, नुरीनगर, फातिमानगर, गुलजारनगर, शांतीनगर अशी मोठी झोपडपट्टी वनखात्याच्या जागेवर उभी आहे. त्याचप्रमाणे कल्याण रोड भागात नवीवस्ती, नेहरूनगर, खदान रोड, फुलेनगर, भय्यासाहेब आंबेडकर नगर, अजमेरनगर, वऱ्हाळदेवी नगर, साठेनगर अशा शासनाच्या व वन विभागाच्या जागेवर या झोपडपट्ट्या वसल्या आहेत. सध्याच्या सुरू असलेल्या पावसामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंबे दरडीच्या छायेत राहत आहेत. काही वर्षांपूर्वी शहरातील गायत्रीनगर आणि अजमेरनगर येथे डोंगराच्या काही भागाचे भूस्खलन झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात इर्शाळवाडीसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोंगरावर झालेल्या लोकवस्तीच्या संरक्षणासाठी महापालिकेने रामनगरमध्ये संरक्षण भिंत बांधली होती. मात्र पंधरा दिवसांपूर्वीच ही संरक्षण भिंत तुटून आतील डोंगर खचला होता.

वास्तविक ही सर्व जमीन वन विभागाची आहे. त्यांचे कार्यालय पडघा येथे आहे. हे कार्यालय ठोस कारवाई करीत नसल्याने येथील भूमाफियांचे फावले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या अनधिकृत वसाहतींत वाढ होत आहे. परिणामी नैसर्गिक आपत्तीला या रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. शहरात मोठ्या संख्येने कामगार आणि मजूरवर्ग राहत आहे. अशा झोपड्यांमध्ये नाईलाजास्तव कामगार आणि मजुरांना राहावे लागत आहे. मात्र दुर्घटना होऊ नये म्हणून मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी सर्व प्रभाग समितीच्या सहा.आयुक्तांना कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून योग्य ती कारवाई करून सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाने ही कारवाई सुरू केली आहे.

प्रतिक्रिया

प्रभाग समिती क्र.१ मध्ये मोठी झोपडपट्टी आहे. या झोपड्पट्टीमधील जे भाग डोंगराच्या कडेला आणि दरडीखाली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी दिले आहेत. त्यामुळे ही कारवाई सुरु आहे.
- सुदाम जाधव, सहा. आयुक्त, भिवंडी महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com