बावीस हजार कुटुंबे दरडीच्या छायेत

बावीस हजार कुटुंबे दरडीच्या छायेत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : शहरातील डोंगराळ भागातील वस्तींवर दरडींचे संकट कायम आहे. मुंबईत १४९ ठिकाणी दरडी कोसळणे व जमीन खचण्याचा धोका असल्याचे समोर आले आहे. या धोकादायक ठिकाणची २२ हजार कुटुंबे दरडींच्या छायेत आहेत. धोकादायक ठिकाणांपैकी पालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सात ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे; तर जिल्हाधिकारी हद्दीतील १४२ धोकादायक ठिकाणी रहिवाशांनी पावसाळ्याआधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा नोटिसा पालिकेने पाठवण्यास सुरुवात केली आहे.
डोंगर उतारावर राहणाऱ्या रहिवाशांचा जीव पावसाळ्यात टांगणीला लागतो. पालिका आणि संबंधित यंत्रणांकडून उपाययोजना म्हणून पावसाआधी काही दिवस स्थलांतराच्या नोटिसा पाठवल्या जातात. धोकादायक दरडींच्या ठिकाणी संरक्षित भिंत उभारण्याचे काम सुरू होते. मात्र ठोस उपाययोजना होत नसल्याने दरवर्षी ही स्थिती कायम राहत असल्याच्या रहिवाशांच्या प्रतिक्रिया आहेत. पावसाळा अगदी महिन्यावर आला असताना संपूर्ण मुंबईत तब्बल १४९ ठिकाणी दरडी कोसळणे, जमीन खचण्याचा धोका असल्याचे समोर आले आहे. यातील फक्त सात ठिकाणच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित १४२ ठिकाणे जिल्हाधिकारी हद्दीत असून या धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांनी पावसाळ्याआधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, याबाबतच्या नोटिसा रहिवाशांना पाठवल्या जात आहेत. संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपाययोजना करण्यासाठी पत्र दिल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
पालिकेने मुंबईतील २०१७ मध्ये एकूण २९९ ठिकाणांचे शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आता संपूर्ण मुंबईत १४९ धोकादायक ठिकाणे शिल्लक आहेत. यातील फक्त सात ठिकाणे पालिकेच्या कार्यक्षेत्रात असून या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनाही करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
.........
प्रत्येक विभागात तात्पुरता निवारा
मुंबईत मुसळधार पावसात दरडी कोसळणे, जमीन खचणे आदी दुर्घटना घडतात. धोकादायक ठिकाणी यंत्रणांकडून खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जातात. अशा दुर्घटनांमध्ये रहिवाशांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था तैनात करण्यात येत आहे. या ठिकाणी आपत्तीग्रस्तांना राहण्याची सोय, तसेच जेवण आणि शौचालय, वैद्यकीय सुविधाही पालिकेच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात येतात, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
..........
अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर
पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. पालिकेने मुंबईत १८८ अतिधोकादायक इमारतींची यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या धोकादायक ठिकाणच्या रहिवाशांनी पावसाळ्याआधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून स्थलांतराच्या नोटिसाही दिल्या जातात. रहिवाशांनी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. दुर्दैवाने कोणतीही दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असा इशाराही पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com