प्रलंबित कामांचा फटका

प्रलंबित कामांचा फटका

वसई, ता. ६ (बातमीदार) : वसई-विरार शहरातील पावसाळी कामे अंतिम टप्प्यात असली, तरी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोंडीची समस्या, तसेच पावसाळ्यातील उपाययोजना अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. जून उजाडला तरी कामे होत नसल्याने लोकप्रतिनिधींनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पावसाळ्यात महामार्ग जलमय होऊन वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्यावर्षी पावसाला सुरुवात होताच महामार्ग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे मुंबई, ठाणे, भिवंडी, गुजरातकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली होती. अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले होते. यंदा महामार्गावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अगोदरच मोठ्या प्रमाणात कोंडी होते. अवजड वाहनांसह हलक्या वाहनांनादेखील अडसर निर्माण होत आहे. पावसाळ्यात महामार्ग हा पूर्णतः कोंडीमुक्त व्हावा, म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रयत्न केले असले तरी लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे.

महामार्गावर महापालिकेच्या परिसरात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत मॉन्सूनपूर्व कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या कार्यालयात आमदार राजेश पाटील, माजी महापौर राजीव पाटील यांनी कामांचा आढावा घेतला. या वेळी महामार्गावरून शहरात जाणाऱ्या, तसेच महामार्गालगत असलेल्या हॉटेल्स, इंडस्ट्रीज, आर.एम.सी. प्रकल्पांनी टाकलेले अनधिकृत मार्ग त्वरित बंद करा, पाण्याचा निचरा करा, अशा सूचना मांडण्यात आल्या आहेत. माजी महापौर राजीव पाटील यांनी व्यवस्थापक पुष्पेंद्र कुमार यांना थेट यंत्रणांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. वसई-दिवा रेल्वे मार्गावरील पुलावर काम सुरू आहे. त्यामुळे पावसाळी पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत. हा मार्ग मोकळा न केल्यास पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार आहे.

एकीकडे या मार्गावर अनेक सुविधांची वानवा आहे. त्यातच पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतो. त्यामुळे यंदा मॉन्सून कालावधीत महापालिका व राष्ट्रीय प्राधिकरण विभाग किती प्रभावी उपाययोजना अंमलात आणणार की पुन्हा महामार्ग पाण्याखाली जाणार, हे पावसाळ्यात स्पष्ट होणार आहे.

अतिक्रमणामुळे नैसर्गिक स्रोत बंद
पेट्रोलपंपाने केलेल्या अतिक्रमणामुळे पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक स्रोत बंद झाला आहे. आजूबाजूच्या गावात पूरसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची भीती माळजीपाडा सरपंचांनी व्यक्त केली. यासंदर्भात दोन दिवसांत सर्व यंत्रणेचे अभियंते, अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून उपाययोजनेचा आढावा घेणार असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.

अनेक ठिकाणी कामे अर्धवट
नाले, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सिस्टीम तयार करून नाले गटारांच्या साफसफाईबाबत लक्ष दिले तर मॉन्सून कालावधीत सोईचे ठरणार आहे. सूर्या प्रकल्प जलवाहिनी अंथरताना, तसेच रस्ते खोदताना झालेले खड्डे, रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही. महामार्गालगत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम, महामार्गालगत असलेली अनधिकृत बांधकामे, टपरींमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

महामार्गावर पावसाळी कामाचे नियोजन झाले नसल्याचे महापालिकेला निदर्शनास आणून दिले आहे. त्यानंतर प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याचे सांगितले. याबाबत मी आणि नवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्यामार्फत पत्रदेखील देणार असून पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मागणी करणार आहोत.
- राजेश पाटील, आमदार

महामार्गावर पावसाळी पाण्याचा निचरा व्हावा, यासंदर्भात कामे केली जात आहेत, तसेच सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार यंत्रणेची मदत घेऊन महापालिका प्रशासनाकडून कामे केली जातील. नागरिकांना असुविधा होणार नाही, याबाबत महापालिका परिसरातील महामार्गावर उपाययोजना करू.
- अनिलकुमार पवार, आयुक्त

ही कामे अपूर्ण :
- जोडरस्त्यांच्या फॅनिंगचे काम अपूर्ण
- महामार्गावरील कल्व्हर्ट बांधकाम पूर्ण नाही
- सेवा रस्ता अद्याप विकसित नाही
- अनेक दुरुस्तीची कामे प्रलंबित
- नालेसफाई व अन्य पावसाळी कामे रखडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com