मुंबईच्या वाट्याला अवघी दोनच मंत्रिपदे

मुंबईच्या वाट्याला अवघी दोनच मंत्रिपदे

मुंबईच्या वाट्याला अवघी दोनच मंत्रिपदे
भविष्यात अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची आशा

बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील तब्बल सहा चेहऱ्यांना संधी मिळाली असली तरी मुंबईच्या वाट्याला केवळ दोनच मंत्रिपदे आली आहेत. २०१९ मध्ये मोदी सरकारमध्ये तत्कालीन शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यासह मुंबईतून तीन लोकांना प्रतिनिधित्व मिळाले होते. पियूष गोयल आणि रामदास आठवले या दोघांनाच आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात संधी मिळाली आहे. त्यामुळे राजकीय साठमारीत गेलेले तिसरे मंत्रिपद मुंबईला भविष्यात तरी मिळणार का, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्त्व आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मोठे आहे. त्यामुळे २०१९ मध्ये मुंबईतून पियूष गोयल, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि रामदास आठवले असे तीन मंत्री मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात होते; मात्र २०१९च्या निवडणुकीत मुंबईतील सहांपैकी सहा जागा तत्कालीन महायुतीला मिळाल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप नेतृत्वात मतभेद होऊन अरविंद सावंत यांनी मंत्रिपद सोडले होते; मात्र यावेळी लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत महायुतीला मोठा फटका बसला आहे. भाजपने लढवलेल्या तीन जागांपैकी केवळ एकच उमेदवार निवडून आला आहे, तर शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे फेरमतमोजणीत काठावर पास झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील पक्षाची झालेली वाताहत जाग्यावर आणण्यासाठी मुंबईला अधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत होती.
उत्तर मुंबईची जागा साडेतीन लाखांहून अधिक मताधिक्याने जिंकलेल्या पियूष गोयल यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंत्री म्हणून गोयल यांची कामगिरी, तसेच पंतप्रधानांचा त्यांनी कमावलेला विश्वास यामुळे गोयल यांना संधी जवळपास निश्चित होती. दुसरीकडे रामदास आठवले यांना पुन्हा राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे; मात्र पियूष गोयल हे भाजपच्या थिंक टँकचा भाग आहेत, ते राष्ट्रीय पातळीवर जास्त कार्यरत असतात. त्यामुळे त्यांना मुंबईत पक्ष संघटनेत काम करायला वेळ मिळेल का, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.
...
१५ जागांवरची पीछेहाट कशी रोखणार?
लोकसभा निवडणुकीत मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यापैकी २० जागांवर महाविकास आघाडी समोर आहे. मलबार हिल, मुलुंड, विलेपार्ले, घाटकोपर (पूर्व), कांदिवली, बोरिवली, मागाठणे, दहिसर, चारकोप यासारखे पक्षाचे पारंपरिक गड महायुतीने मोठ्या मताधिक्याने राखले आहेत, तर अनेक विधानसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांनी किरकोळ आघाडी घेतली आहे. महायुतीच्या १५-१७ जागा धोक्यात असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेली पीछेहाट केवळ दोन मंत्रिपदे देऊन रोखता येईल का, हा प्रश्न आहे.
...
दलित मतांच्या बेगमीसाठी आठवले
मुंबईसह महाराष्ट्रात महायुतीपासून दलित मते दुरावली आहेत. वंचित आघाडीलाही नाकारत दलित समाजाने महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे निकालाच्या विश्लेषणावरून स्पष्ट दिसत आहे. राज्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पाचपैकी पाच जागांवर आघाडीने मुसंडी मारली आहे. त्यामुळे नाराजी कमी करण्यासाठी रामदास आठवलेंना मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा संधी दिली आहे; मात्र यावेळी स्वतंत्र प्रभार तरी मिळेल, अशी आशा आठवले यांना आहे.
...
मुंबईचे किती महत्त्व आहे, याचा विचार न करता आपले किती खासदार निवडून आले आहेत, त्याच प्रमाणात मंत्रिपदे दिल्याचे दिसत आहे. मुंबईला २०१९ एवढीही मंत्रिपदे मिळालेली नाहीत.
- जयंत माईणकर, ज्येष्ठ पत्रकार
...
सध्याच्या सरकारमध्ये अनेक घटक पक्ष असल्याने प्रत्येकाला सत्तेचा वाटा द्यायचा असल्याने मुंबईला दोनच मंत्रिपदे आली आहेत. मुंबईतून त्यांचे खासदारही दोनच निवडून आल्याने दोनच मंत्री दिले असावेत.
- प्रताप आसबे, राजकीय विश्लेषक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com