पावसाळ्यात वाहने जपून चालवा  !

पावसाळ्यात वाहने जपून चालवा  !

पावसाळ्यात वाहने जपून चालवा  !
वाहतूक विभागाचे आवाहन; मुंबईत २८३ अपघाती मृत्‍यू
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १०  : पावसाळा सर्वांनाच आवडीचा असला तरी वाहनचालकांसाठी त्रासदायक असतो. पावसामध्ये वाहन चालवताना थाेडे दुर्लक्ष झाले तरी गंभीर अपघात घडतात. ते टाळण्यासाठी पावसाळ्यात वाहनांची योग्य ती काळजी घ्यावी अन्यथा जीवावर बेतू शकते, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. मुंबई-पुणे महामार्गावर २०२३ मध्ये वर्षभरात ६२ जणांचा मृत्यू झाला होता, तर मुंबई शहरात २८३ जणांचा रस्ते अपघातात जीव गेला होता.   
‘सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या सार्वजनिक धोरण आणि संशोधन संचालक करुणा रैना यांनी सांगितले की, पावसाळ्यात देशभरातील सर्व प्रकारच्या रस्त्यांवर पायाभूत सुविधांच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. मुख्य घटकांमध्ये रस्ता सुरक्षा ऑडिट आणि नियमित देखभाल कामाचा अभाव यासह खराब रस्ते बांधकाम साहित्याचा समावेश आहे. सतत जड वाहतूक, पाणी साचणे, गळती आणि सदोष ड्रेनेज यांमुळे रस्त्यांची प्रचंड झीज होते. त्यामुळे पडलेल्‍या खड्ड्यांमुळे रस्त्यावर जीवघेणे अपघात होतात.
पावसाळ्यातील अपघातांच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व राज्यांना मोटार वाहन कायदा २०१९ च्या कलम १९८अ ची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
दरम्यान,  गेल्यावर्षी  एसटी महामंडळाच्या अनेक बसस्थानक परिसरात खड्डे पडले होते.  या  पावसाळ्यापूर्वी बसस्थानक परिसरातील सर्व खड्डे बुजवून सपाटीकरण करून घ्यावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रशासनाला दिले होते. एसटी महामंडळाने स्वच्छता मोहीम राबविली होती. त्यामुळे यंदाही एसटी प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.  
--------
एसटी गळती थांबणार 
एसटीच्या मुंबई आगारात २७० एसटी बस आहेत. गेल्यावर्षी काही बस गळत असल्याच्या  तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. यंदा बसमध्ये पावसाळ्यापूर्वी पोस्टिंग लावण्यात येत आहे. त्यामुळे  यंदा एसटीमधून पाणी गळती होणार नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. 

मुंबईकरांसाठी खड्डे ठरताहेत डोकेदुखी
पावसाळा सुरू झाल्‍यानंतर रस्‍त्‍यांवर पडणारे खड्डे मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरतात. रस्‍त्‍यांची चाळण होते. खड्डा चुकवताना होणारे अपघात, वाहतूक कोंडी अशा समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावे लागत आहे. 

हे रस्ते धोकादायक
वांद्रे वरळी सी-लिंक, पश्चिम पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन पनवेल महामार्ग, वडाळा-सीएसएमटी मार्ग, विक्रोळीतील गोदरेज घोडा गेट सिग्नल, मुलुंडकडून येताना ऐरोली पुलाआधीचा भाग, मानखुर्द जकात नाका, नेस्कोसमोर आरे जंक्शन, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील छेडानगर.
---------
ब्लॅक स्पाॅटमुळे सर्वाधिक मृत्यू
मुंबईतील ५८ ब्लॅकस्पाॅटपैकी अर्ध्याहून अधिक हे पूर्व द्रुतगती महामार्गावर आहेत. ठाण्यापासून ते दक्षिण मुंबईपर्यंतच्या मार्गावर ब्लॅकस्पाॅटमुळे अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. त्यात वेगमर्यादा ओलांडणे, लेन कटिंग, वाहतुकीचे नियम मोडणे असे प्रकार होत असल्याने अपघाती मृत्यू वाढत असल्याचे दिसून येत आहे.


मुंबईतील आकडेवारी 
वर्ष - अपघात - मृत्यू - जखमी
२०२२---१८९५---३७१
२०२३---१४७४----२८३--

मुंबईतील ब्लॅक स्पाॅटचा अभ्यास करून कारणे शोधण्यात आली. यामध्ये  रस्तेबांधणीतील दोष, अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतूक नियमांच्या जनजागृतीचा अभाव  या कारणांनुसार उपाययोजना करण्यात आल्या. त्यासाठी संबंधित यंत्रणांना पाठपुरावा करण्यात आला. 
एम रामकुमार , अप्पर पोलिस आयुक्त, वाहतूक 


वेळेवर सर्व्हिसिंग करा
पावसाळ्यात वाहनाची वेळेवर सर्व्हिसिंग करावी, दृश्यमानता कमी असल्याने हेडलाईट, टेललाईट आणि इंडिकेटर तपासून घ्यावे, वायपर तपासावे, वाहनाचे ब्रेक नीट असणे गरजेचे आहे. टायरच्या हवेमधील दाब, ट्रेड डेप्थ व स्टेपनी तपासावे. पुढील वाहन व स्वत:चे वाहन यात योग्य अंतर असावे.
भरत कळसकर, उपायुक्त
रस्ता सुरक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य

वाहन हळू चालवा
पावसाळ्यात अनेकदा ब्रेक स्किड होतात. त्यामुळे वाहन हळू चालवावे. टायर उत्तम स्थितीत असणे खूप जास्त गरजेचे आहे. अन्यथा ब्रेक दाबल्यानंतर मोटार घसरते. त्यामुळे टायर खराब असल्यास अपघाताचा धोका वाढतो. पावसाळ्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त अपघात होतात, त्यामुळे वाहनचालकांनी काळजी घ्यावी.
डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूक तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com