प्रवाशांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी ‘प्रवासी राजा दिन’

प्रवाशांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी ‘प्रवासी राजा दिन’

Published on

प्रवाशांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी ‘प्रवासी राजा दिन’
१५ जुलैपासून एसटी महामंडळाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. ही अभिनव योजना १५ जुलैपासून सुरू होणार आहे.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले की, एसटीच्या विविध बसमधून दररोज सुमारे ५४ ते ५५ लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. प्रवाशांना एसटी बसस्थानक, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ, निर्जंतुक ‍आणि टापटीप असावीत असे वाटते. तसेच एसटी बस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. यासंबंधित प्रवाशी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोईंचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते. प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक असते. तसे झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य होणार आहे. सर्व प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन कुसेकर यांनी केले आहे.

एसटीचे जिल्हाप्रमुख म्हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.
- डॉ. माधव कुसेकर,
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
एसटी महामंडळ

मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार
प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या-तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडू शकतात. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. ‘प्रवासी राजा दिन’ कोणत्या दिवशी, कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक जाहीर करतील. विशेष म्हणजे प्रत्येक लेखी तक्ररीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.