शहापूर, मुरबाडमध्ये पावसाचे थैमान

शहापूर, मुरबाडमध्ये पावसाचे थैमान

Published on

शहापूर, मुरबाडमध्ये पावसाचे थैमान

अनेक गावांचा संपर्क तुटला; नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, कल्याण आणि भिवंडी तालुक्यांत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे रविवारी जनजीवन विस्कळित झाले. दोन्ही तालुक्यांतील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शहापूर तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास, भातसा, काळू आणि भारंगी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. खर्डी येथील बागेचा पाडा येथील दोन महिन्यांपूर्वी पूल वाहून गेला, तर शहापूर-किन्हवली रस्त्यावर पाण्याचे पाट वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मुरबाड आणि शहापूर तालुक्यांना जोडणारा चिखले गावाजवळील काळू नदीवरील पुलावरून शनिवारी रात्रीपासून पाणी वाहू लागल्यामुळे वाहतूक बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यात एकूण ६५ मिमी पाऊस झाला असून सर्वाधिक पावसाची नोंद भिवंडी तालुक्यात ९४.८ मिमी एवढी झाली, तर सर्वात कमी ३७.५ मिमी पाऊस झाला.

कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली, मोहने येथील पाणीपुरवठा केंद्रांत पाणी घुसून पाणीपुरवठा बंद पडण्याची शक्यता असून मोहने-टिटवाळा परिसराला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी पोहोचले आहे. टिटवाळ्यातील सावरकरनगर भागातील वस्तीत रात्रीपासून पाणी घुसले आहे. कल्याणमधील दुर्गाडी परिसरातील बाजारपेठ, बैलबाजार भागात पाणी घुसण्याची शक्यता असून खाडीकिनारचे रहिवासी, तबेलेधारकांनी स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. मुसळधार पावसाच्या पाश्‍वभूमीवर पालिकेची यंत्रणाही सज्ज झाली आहे. माहुली किल्ला परिसरात भारंगी नदी दुथडी भरून वाहत असून आसपासच्या वस्तीत पाणी शिरले आहे. भातसा, काळू नद्यांच्या पात्रात वाढ झाली आहे. शहापूरमध्ये भारंगी नदीच्या पुराचे पाणी इमारतीच्या पार्किंगमध्ये घुसल्याने गाड्या पाण्याखाली गेल्या. गुजराती बागेत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले होते. आटगाव-आसनगाव स्थानकादरम्यान झाड पडल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. वासिंद रेल्वेस्थानकाजवळ पोल सरकल्याने रेल्वे वाहतूक तासभर ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. मुरबाड-शहापूर तालुक्यांदरम्यानचा काळू नदीवरील चिखले पुलावरून पाणी वाहू लागल्याने मुरबाडमधील झापवाडी, चिखले, शेई आणि शहापूर तालुक्यातील वासिंद, पालघर जिल्ह्यातील वाडा, कुडूस या गावांचा संपर्क तुटला आहे.
-----
शहापूरमध्ये १५० पर्यटकांची सुटका
शहापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. मुंबईहून शहापूरच्या वासिंद भातसई येथे एका फार्महाऊसवर पावसाळी सहलीसाठी आलेले १५१ जण अडकले होते. त्यांची ठाणे येथील ‘एनडीआरएफ’च्या पथकाने सुखरूप सुटका केली.
---
ठाणे जिल्ह्यात झालेला पाऊस
तालुका : प्रमाण (मि.मी.)
ठाणे : ४६.१
कल्याण : ८४.१
मुरबाड : ८०.००
भिवंडी : ९४.८
शहापूर : ४७.६
उल्हासनगर : ३७.५
अंबरनाथ : ५९.४
एकूण : ६५.००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.