पाण्यात गेला असाल तर डोस आवश्यक

पाण्यात गेला असाल तर डोस आवश्यक

Published on

साचलेल्‍या पाण्यातून लेप्टो संसर्गाचा धोका
पाण्यात गेल्‍यास डोस आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गेल्या चार दिवसांपासून मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. सध्या परिस्थिती सामान्य झाली असली तरी आता पाणी साचलेल्या भागातून जाणाऱ्यांना लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
संक्रमित विष्ठा आणि उंदीर, कुत्रे, मांजर, गुरेढोरे यांसारख्या चतुष्पाद प्राण्यांच्या लघवीच्या संपर्कातून लेप्टोस्पायरोसिस रोगाचा धोका वाढतो. विशेषतः पावसाळ्यात मलमूत्र पाण्यात मिसळल्याने धोका दुप्पट होतो. अशा परिस्थितीत पाणी साचलेल्या भागातून गेलात आणि पायाला दुखापत झाल्‍यास हे जीवाणू तुमच्या शरीरात प्रवेश करतात. नुकत्याच झालेल्या पावसात हजारो मुंबईकर पाणी साचलेल्या भागातून गेले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त आहे.
पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यात लेप्टोचे २८ रुग्ण आढळले आहेत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची विचारपूस करावी आणि ते अर्ध्या तासापेक्षा जास्त पाण्यात राहिले असल्‍यास त्यांना डॉक्सीसाइक्लिन औषधाचा डोस द्यावा, असे पालिकेने सर्व दवाखाने आणि रुग्णालयांना सूचित केले आहे. या डोसमुळे बॅक्टेरिया शरीरात वाढू शकत नाहीत.

लेप्टोची लक्षणे
लेप्टोच्या रुग्णांमध्ये ताप, थंडी, डोकेदुखी, जुलाब, कावीळ, पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे ही काही सामान्य लक्षणे आहेत. वरील लक्षणे ही सामान्य तापासारखीच आहेत; परंतु निष्काळजीपणा न करता ताबडतोब पालिका रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. लेप्टो आजारावर उपचार शक्य आहे; पण एखाद्याने बेफिकीरी केल्‍यास त्रास वाढू शकतो. ताबडतोब तपासणी न केल्‍यास हा आजार मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतो.

प्रतिबंध आणि संरक्षण
* मुंबईत पाऊस पडत असताना पाणी साचलेल्या भागात जाऊ नका.
* शरीरावर काही दुखापत किंवा ओरखडे असल्यास त्यावर ताबडतोब उपचार करा; अन्यथा पाण्यात असलेले बॅक्टेरिया संपर्कात येताच शरीरात प्रवेश करू शकतात.
* घरी पाळीव प्राण्यांना लेप्टोचे लसीकरण करून घ्या.
* घराभोवती स्वच्छता ठेवा आणि पाणी साचू देऊ नका.
* पावसाळ्यात ट्रेकिंग आणि साहसी सहलीला जाऊ नका.

जेजे रुग्णालयातील औषध विभागाचे युनिट प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले की, यावेळी मुंबईत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच लेप्टोने बाधित लोक उपचारांसाठी येत आहेत. अनेक रुग्णांचा इतिहास घेतल्यावर असे आढळून आले आहे की, काही लोक गटारे, नाले साफ करणारे मजूर किंवा कर्मचारी, असे लोक घाणेरडे पाणी आणि संक्रमित मातीच्या संपर्कात येताच रोगराईच्या विळख्यात सापडतात.

साचलेल्या पाण्यातून रस्त्यावरून चालले असेल तर त्याला लेप्टो होण्याची शक्यता जास्त आहे. येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते. त्यामुळे प्रत्‍येकाने पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.
- डॉ. मधुकर गायकवाड,
औषध विभाग युनिट प्रमुख, जे. जे. रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.