मच्छीमारांवर दुहेरी संकट

मच्छीमारांवर दुहेरी संकट

Published on

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. १२ : पालघर जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा असला तरी मच्छीमार बांधवांना अनेकदा नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागते. सद्य:स्थितीत मासेमारी बंद आहे, मात्र पारंपरिक मासेमारीवरदेखील अवकळा आली आहे. किनाऱ्यापासून ५०० मीटरपर्यंत मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दीड-दोन महिने खायचे काय, जगायचे तरी कसे, असा टाहो मच्छीमार बांधव फोडत आहेत.

पालघर, सातपाटी, डहाणू, नायगाव, कोळीवाडा, अर्नाळा, पाचूबंदर येथील समुद्रकिनारी मच्छीमार हे पापलेट, करंदी, बोंबील, सुरमई, दाढा, कोलंबी, पकवट, हलवा, घोळ, रावस यांची मासेमारी करतात, परंतु मेमध्ये अवकाळी पाऊस आणि घोंघावणाऱ्या वाऱ्यामुळे मच्छीमार बोटी माघारी फिरल्या. त्यानंतर काही दिवसांनीच मासेमारी बंद झाली. वादळी वारे, अवकाळी पावसामुळे मासेमारी व्यवसायावर गदा आली. त्यातच पावसाळी हंगामात नागरिकांच्या सुरक्षेसाठी व मासे प्रजनन कालावधी पाहता मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे.

कव मासेमारी म्हणजे खोल समुद्रात यांत्रिकी बोटीच्या साह्याने केली जाते, परंतु सध्या बंद आहे, तर बोक्षी मासेमारी म्हणजे समुद्रकिनारी करण्यात येणारी मासेमारी आहे. पावसाळ्यात खोल समुद्रात न जाता ही मासेमारी केली जाते. यासाठी पाण्यात जाळे टाकून मासे पकडले जातात, तर दोन काठ्या लावून त्याला जाळे बांधून वेढी तयार केली जाते व त्याद्वारे मच्छीमार मासे जाळ्यात ओढतात. पूर्वापार मासेमारीसाठी हा अवलंब पावसाळ्यात केला जातो. त्यातून मिळणाऱ्या माशांचा वापर घरासाठी केला जातो, तसेच जास्त प्रमाणात मासे मिळाल्यास विक्री केली जाते, परंतु सद्य:स्थितीत या मासेमारीलादेखील मज्जाव केला गेला आहे. तसेच यांत्रिकी बोटी ५०० मीटरपर्यंत नेण्यास मनाई आहे. त्यामुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. मच्छीमारांवर दुहेरी संकटाचे वारे घोंघावू लागले असून, आर्थिक कोंडीच्या कात्रीत सापडला आहे.

मासे प्रजनन कालावधी
पावसाळ्यात मासेमारी बंदीचा कालावधी असतो. या वेळी माशांचा प्रजनन काळ असल्याने त्याची वाढ व्हावी व पुढे चांगले मासे मिळावेत, हा यामागे हेतू असतो. तसेच वादळ, वारा व पावसामुळे नागरिकांना धोका निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी मासेमारीबंदी कालावधी जाहीर केला जातो.

ड्रोनची करडी नजर
यांत्रिकी बोटीतून मासेमारी केली जाऊ नये, म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. अशा बोटींवर ड्रोनची नजर ठेवण्यात आली असून, पोलिसांचा जागता पहारादेखील समुद्रकिनारी गस्त घालत आहे.

प्रशासनाकडून पाहणी
मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी नुकतीच पालघर समुद्रकिनारी पाहणी केली. या वेळी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये यासह अन्य सूचना केल्या. यांत्रिकी बोटी बंद करण्यात आल्या असून, मासेमारी करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाळ्यात खोल समुद्रात जाऊ शकत नाही, अशातच किनाऱ्याजवळ पारंपरिक पद्धतीने करण्यात येणारी मासेमारी बंद केली. वाड-वडिलांपासून सुरू असलेल्या मासेमारीवर गदा आली. त्यामुळे आम्ही खायचे तरी काय, उदरनिर्वाह कसा चालणार, हा प्रश्न आहे. ज्यांच्या कुटुंबात कमावणारा एकच व्यक्ती असेल व मासेमारीवर अबलंबून असणाऱ्यांचे काय, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सरकारने याबाबत योग्य तो मार्ग काढावा.
- डेनिस कतवार, मच्छीमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com