ग्रामविकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर

ग्रामविकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर

Published on

ग्रामविकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर
मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रशासनाला सूचना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : जिल्हा परिषदेवरील लोकांची असलेली विश्वासाहर्ता टिकून राहावी, यासाठी यापुढे ग्रामविकास विभागाने मंजूर केलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करावीत, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा समिती सभागृहात केंद्र व राज्य पुरस्कृत कामांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

ठाणे जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आले होते. या वेळी खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे, माजी राज्य मंत्री कपिल पाटील, आमदार किसान कथोरे, निरंजन डावखरे, संजय केळकर, सुलभ गायकवाड, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि दौलत दरोडा आदी उपस्थित होते. या वेळी ग्रामविकास विभागाकडून मंजूर होणारी कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावीत, अशी मागणीदेखील करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील बिलिंग पद्धती सोपी असून, जिल्हा परिषदेची बिलिंग पद्धती ही वेळखाऊ आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांचा कल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असतो; मात्र जिल्हा परिषदेतील कामकाजातदेखील काही बदल करत ही कार्यप्रणाली कशी सोपी होईल यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणे उच्च दर्जाचे काम जिल्हा परिषदेने करावे, यासाठी ज्या सुधारणा करणे अपेक्षित आहे. त्या करण्याच्या सूचनादेखील दिल्याची माहिती मंत्री गोरे यांनी दिली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुसज्ज रस्ते मिळावे, यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील १० हजार किलोमीटरचे व्हाइट टोपिंगची सिमेंटचे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील गावांना जोडणारे रस्तेदेखील सुसज्ज होतील, असा विश्वासदेखील मंत्री गोरे यांनी व्यक्त केला.

आयुष्मान योजनेचे काम असमाधानकारक
गोरगरीब नागरिकांना चांगल्या रुग्णालयात दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आयुष्मान भारत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. यासाठी आयुष्मान भारत हे कार्ड काढणे अनिवार्य आहे; मात्र ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यात अवघ्या २० टक्के लोकांचे आयुष्मान भारत कार्ड काढल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परागे यांनी दिले. त्यावर मंत्री गोरे यांनी नाराजी व्यक्त करीत आयुष्मान योजनेच्या कामाबाबत समाधानकारक नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com