२३ गावांतील जलस्त्रोत दूषित
अलिबाग, ता. ३० (वार्ताहर) ः पावसाळ्यात शहरासह ग्रामीण भागातही अनेकदा गढूळ पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होतो. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने स्वच्छता व पाणी मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांची जैविक तपासणी केली. जिल्ह्यातील एक हजार ४०३ गावांची तपासणी करून चार हजार ४३ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यात २३ गावांमधील ३६ ठिकाणचे नमुने दूषित आढळले. याबाबत जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या समाधानकारक पडत असल्याने धरणे, विहिरी तुडुंब भरले आहेत. रायगड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ धरणांपैकी सुतारवाडी, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंध, कोंडगाव, उन्हेरे, कवेळे, भिलवले, वावा, फणसाड, घोटवडे, कोलतो-मोकाशी डोणवत या १६ धरणांमध्ये १०० टक्के जलसाठा आहे. कार्ले, अवसरे, बामणोली, उसरण या धरणांमध्ये ७५ टक्के; कुडकी, आंबेघर या दोन धरणांमध्ये ९९ टक्के आणि श्रीगांव, ढोकशेत, साळोख, मोरबे, पुनाडे, रानीवली या सहा धरणांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत जलसाठा उपलब्ध आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे.
जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, गाढी या नद्यांची पातळीही वाढली आहे. कोलाड येथील लघुपाट बंधारे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या धरणांमधून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. धरणांमधील साठा वाढल्याने पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे, मात्र पावसामुळे धरणांमधील पाणी गढूळ झाले आहे. काही धरणांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र असूनही नागरिकांना अशुद्ध पाणी मिळत आहेत. काही ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असल्याने क्लोरीन टाकून ते पाणी देण्याचा प्रयत्न केला जातो. तरीदेखील नळाद्वारे येणारे पाणी गढूळ असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांची जैविक तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील एक हजार ८३० गावांपैकी एक हजार ४०३ गावांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले होते. यात २३ गावांमधील ३६ ठिकाणचे नमुने दूषित असल्याचे आढळले. रोगराई टाळण्यासाठी प्रशासनाकडून जलशुद्धीकरणावर भर दिला जात आहे.
ग्रामपंचायतींकडून कार्यवाही सुरू
जिल्ह्यातील २३ गावांमधील ३६ ठिकाणी पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. या गावांतील दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होऊ नये, म्हणून उपाययोजना करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायतींकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.