वाड्यातील भातशेती झाली परवडेनाशी
वाड्यातील भातशेती परवडेनाशी
मजुरीसाठी मोजावे लागतात दररोज ४५० ते ५००
वाडा, ता. ५ (बातमीदार) ः जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच तालुक्यातील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाली आहे, मात्र एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरुवात झाल्याने वाडा येथे मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागतात. त्यात मजुरांचे दरही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. एका शेतमजुराला दररोज ४५० ते ५०० रुपये सकाळी न्याहरी, दुपारी जेवण द्यावे लागते. यामुळे शेती हा खर्चिक व्यवसाय होऊ लागल्याने ती परवडेनाशी झाली आहे.
भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा तालुक्यात एकेकाळी मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या होती, पण १९९५ पासून या तालुक्यात उद्योगधंदे आल्यामुळे येथील मजूर उद्योगधंद्यात कामाला लागले आहेत. शिवाय बांधकामासाठी शहरात व नदी खाडीकिनारी वर्षभर रेती काढण्यासाठी शेकडो मजूर जात असल्याने मजुरांची टंचाई जाणवते. भातशेतीसाठी पावसाळ्यात मिळणारे मजूर गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नसल्याने भातपिकाची लागवड करायची कशी, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. भातलावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. त्यामुळे येथील भातशेती संकटात सापडली आहे.
तालुक्यात १७६ गावे २०९ हून अधिक पाडे असून, १५ हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली आहे. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. येथे झिनी (वाडा कोलम), सुरती, सुवर्णा, जोरदार, वाय.एस.आर, मसुरी, एककाडी, गुजरात ११, गुजरात १३, वाडा झिनिया, रत्नागिरी सात, रत्नागिरी आठ, रत्ना, जया, कर्ज आदी भातांच्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.