बाजारपेठेत खड्ड्यांचे साम्राज्य
कासा, ता. १४ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्य महामार्गावरील डहाणू ते वरोतीदरम्यानच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः कासा, चारोटी आणि वरोती या प्रमुख बाजारपेठांमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी, अपघातांची शक्यता वाढली असून, अनेक अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना त्याची खोली किंवा आकार लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकही गाडीचा ताबा गमावत आहेत. कासा येथील आचार्य भिसे विद्यालय राज्य महामार्गालगत असल्याने, येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागते. या मार्गावरून रोज शेकडो विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सामान्य नागरिक प्रवास करतात. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे केवळ अपघाताची भीतीच नाही, तर वाहनांच्या देखभालीसाठीही मोठा खर्च करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या मार्गावरून अनधिकृतपणे किंवा नियमांपेक्षा जास्त वजनाचे अवजड ट्रक आणि ट्रेलर सतत चालत असल्यामुळे रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पोलिस प्रशासनदेखील या वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, नागरिकांनी तातडीने दुरुस्तीच्या कामांना गती देण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत प्रवाशांचा व विद्यार्थ्यांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यांची त्वरित डागडुजी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
रस्त्याशेजारी गटार बांधण्याची गरज
कासा आणि वरोती बाजारपेठांमध्ये गटारींचा अभाव हीदेखील एक गंभीर समस्या आहे. गटारी नसल्याने पावसाळ्यातील पाणी थेट रस्त्यावरच साचते आणि त्यामुळे रस्त्याची झीज वेगाने होते. परिणामी, प्रत्येक पावसाळ्यानंतर नव्याने खड्डे पडतात आणि दरवर्षीच हा त्रास सुरू होतो. स्थानिकांनी मागणी केली आहे की, भविष्यातील रस्त्याच्या दुरुस्ती किंवा रुंदीकरणाच्या वेळी मजबूत गटारी बांधाव्यात, जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल व रस्त्याचे आयुष्य वाढेल.
पावसाळा सुरू होताच डहाणू ते तलवाडादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. विद्यालयासमोरील मोठ्या खड्ड्यांमुळे अवजड वाहने त्यांना चुकवण्यासाठी रस्त्याच्या कडेला जातात. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. पाणी रस्त्यावर साचत असल्याने मोठ्या अपघातांची शक्यता वाढली आहे.
- रवी वानखेडे, ग्रामस्थ
सध्या डहाणू-तलवाडा राज्य मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याबाबतीत संबंधित कंत्राटदारांना तातडीने खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर कमी होताच लवकरात लवकर खड्डे भरले जातील.
- मनीष चकदरे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.