नवापूर नाका परिसरात रिक्षा आणि फेरीवाल्यांवर शिस्तीची कास
तारापूर, ता. २४ (बातमीदार) : नवापूर नाका परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पोलिस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील मनमानी रिक्षा पार्किंग व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त होते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने विशेष मोहिमेद्वारे शिस्त लावली जाणार आहे.
नवीन नियमानुसार नवापूर नाक्यावर केवळ आठ रिक्षांना ठरावीक रेखाटलेल्या जागेतच थांबण्याची परवानगी दिली जाणार आहे अन्यथा थेट कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी दिला. तसेच रस्त्यालगत फेरीविक्री करणाऱ्यांना दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांना ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या असून, न हटवल्यास पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटवण्यात येईल.
नवापूर रोड ते रेल्वे स्थानक, स्थानक ते बस डेपो आणि ओसवाल चौक परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व्यापारी, फेरीवाले व वाहनधारकांना सूचना दिल्या आहेत. या कारवाईसाठी ग्रामपंचायत, वाहतूक शाखा आणि पोलिस प्रशासन सज्ज असून, रस्त्यावरील अनधिकृत अडथळे दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू आहेत.
या मोहिमेवेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, निरीक्षक शिरीष पवार, वाहतूक निरीक्षक सुरेश साळुंखे, ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे, उपसरपंच नीलम संखे, सरपंच दिलीप धोडी, शिवशक्ती संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.