सावित्रीबाई फुले नाट्यगृह दोन महिने बंद
सावित्रीबाई फुले नाट्यगृह दोन महिने बंद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : डोंबिवली शहर हे केवळ औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्याच नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही एक संपन्न शहर मानले जाते, परंतु याच सांस्कृतिक शहरातील सावित्रीबाई फुले नाट्यगृह दोन महिन्यांनंतरही बंद अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च किती हे ठरवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. खर्चाचा आवाका मोठा असल्याने प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. निधी नाही, नियोजन नाही यामुळे शहराच्या संस्कृतिक जीवनाला जणू विराम मिळाला आहे.
सांस्कृतिक डोंबिवली शहराचा मानबिंदू म्हणून सावित्रीबाई फुले नाट्यगृहाकडे पाहिले जाते. दिवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागातील रसिकांसाठी हे एकमेव नाट्यगृह आहे. सुट्टीच्या दिवसांत नाटकांच्या प्रयोगासाठी तसेच विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी येथे आयोजकांची व रसिक श्रोत्यांची मोठी गर्दी होते. मे महिन्यात नाट्यगृहाच्या फॉल सिलिंगचा एक तुकडा कोसळल्यानंतर नाट्यगृह बंद करण्यात आले. या स्थितीत कलाकार, नाट्यगृह संस्थांचे कार्यकर्ते, निर्माते, रसिक प्रेक्षक सगळ्यांनाच नाट्यगृहाच्या बंद दरवाजापुढे निराश उभे राहावे लागत आहे. या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, स्थानिक नाट्यसंस्था, संगीत-नृत्य कार्यशाळा, लहान व्यावसायिक नाटकांचे प्रयोग यांचे आयोजन नियमितपणे होत असे. आता या सर्व गोष्टी बंद पडल्या आहेत.
नाट्यगृहाच्या पडझडीनंतर हे नाट्यगृह २० वर्षे जुने झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय यंत्रणा केवळ खर्चाचा अंदाज लावण्यात गुंतल्याचे दिसते. नाट्यगृहात नूतनीकरण आवश्यक असून, त्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. केडीएमसीने हा खर्च आपल्या आवाक्याबाहेरचे मानत राज्य सरकारकडे निधीसाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे, पण या सर्व प्रक्रियेमध्ये सामान्य नागरिकांची उपेक्षा होत आहे. याविषयी पालिकेच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद येत आहे.
प्रवासाचा खर्च, वेळेचा अपव्यय
१) कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे काही प्रयोग होत असले तरी डोंबिवलीकर रसिकांसाठी ते सहजसोपे नाही. प्रवासाचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि अपुरी बस व्यवस्था यामुळे अनेक नागरिक कार्यक्रमांकडे पाठ फिरवत आहेत. हे फक्त नाट्यगृहाचे नव्हे तर शहराच्या सांस्कृतिक अस्मितेचे नुकसान असल्याचे रसिक श्रोते बोलत आहेत.
२) सांस्कृतिक जीवन हे शहराच्या मानसिक आरोग्याचे द्योतक असते, पण डोंबिवलीसारख्या शहरात अशा नाट्यगृहाचे दीर्घकाळ बंद राहणे ही फक्त एक तांत्रिक वा आर्थिक अडचण नाही. ती प्रशासनाच्या उदासीनतेची, नियोजनशून्यतेची आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांप्रती असलेल्या बेफिकिरीची साक्ष असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात.
३) पालिकेच्या अर्थसंकल्पात जो निधी ठेवला जातो, तो नाट्यगृहातील किरकोळ दुरुस्तीसाठी वापरला जातो. आत्ताचा दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा खर्च हा मोठ्या प्रमाणात असल्याने त्या निधीसाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. निधीला मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पार पाडली जाईल. यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.