कृत्रिम फुलांवरील बंदीमुळे फुलशेतीला सुगीचे दिवस

कृत्रिम फुलांवरील बंदीमुळे फुलशेतीला सुगीचे दिवस

Published on

अमोल सांबरे : सकाळ वृत्तसेवा
विक्रमगड, ता. ३१ (बातमीदार) : लवकरच राज्यात प्लॅस्टिक व कृत्रिम फुलांवर बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. अलीकडच्या काळात विविध समारंभ, मंदिरे, मंगल कार्यालये, उत्सव आदी ठिकाणी प्लॅस्टिक फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढल्यामुळे नैसर्गिक फुलांची मागणी घटली होती. परिणामी फूल उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते, मात्र सरकारच्या निर्णयामुळे विक्रमगड तालुक्यातील शेतकरी पुन्हा फुलशेती जोमाने करू लागणार आहे.

प्लॅस्टिक फुलांवरील बंदीमुळे आता फूल उत्पादनाला गती मिळण्याची आशा आहे. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय या फूल उत्पादकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुल शेतीकडे शेतकरी वळला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोगरा, त्याचबरोबर गुलाबाची लागवडदेखील झाली आहे. तालुक्यात सुगंधी सोनचाफ्याचे उत्पादनदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसाळ्यानंतर येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड करतात, मात्र प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर वाढल्याने नैसर्गिक फुलांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते.

राज्य सरकारच्या प्लॅस्टिक फुलांवरील बंदीमुळे फूल उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर फुलांचे भाव स्थिर राहण्यात मदतदेखील होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. फुलशेतीत शेतकऱ्यांना योग्य आणि स्थिर राहणार असल्याने तालुक्यातील फुलशेती आणखी वाढणार वाढणार आहे.

इतर व्यावसायिकांनाही फायदा
फूल उत्पादक शेतकऱ्यांसह फूल सजावट करणारे डेकोरेटर्स, हार, फुलांची वाहतूक करणारे व्यापारी अशा अनेक व्यावसायिकांना या बंदीचा फायदा होणार आहे. नैसर्गिक फुलांवर आधारित संपूर्ण साखळी पुन्हा सशक्त होणार आहे. यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील. शिवाय प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान थांबणार आहे.

प्लॅस्टिकमुळे फूल उत्पादक संकटात
प्लॅस्टिक फुलांच्या वापरामुळे शेतीमधून आलेल्या फुलांची विक्री कमी होत चालली होती. गुलाब, झेंडू, शेवंती, मोगरा यांसारख्या पारंपरिक फुलांची बाजारपेठ कमी होत गेली. अनेक शेतकरी फूलशेती सोडून इतर पिकांकडे वळू लागले होते; पण प्लॅस्टिक फुलांवर बंदी आल्यास बाजारात नैसर्गिक फुलांची मागणी पुन्हा वाढेल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

फुलांचे पारंपरिक महत्त्व
भारतीय संस्कृतीत फुलांना विशेष महत्त्व आहे. देवता व फूल अशाही परंपरा आहेत. पूजा, उत्सव, विवाहसोहळे अशा प्रत्येक शुभप्रसंगी नैसर्गिक फुलांचा वापर होतो; परंतु प्लॅस्टिक फुलांनी ही परंपरा विसरली जात होती. बंदीमुळे पुन्हा नैसर्गिक फुलांना सन्मान मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या फुलांना भाव मिळणार
गणेश उत्सव, नवरात्रीमध्ये, तसेच इतर सणांना फुलांना चांगला भावही मिळतो, मात्र प्लॅस्टिकच्या फुलांमुळे विक्रीत घट येत होती. आता प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी आणल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचा चांगला फायदा होणार आहे. फुलांच्या विक्रीत वाढ झाल्यास आम्हाला चांगला भावदेखील मिळेल, असे शेतकरी रामचंद्र भोये यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com