मासळी गावतच न्हाय...

मासळी गावतच न्हाय...

Published on

मासळी गावतंच न्हाय...
उरण परिसरातील मच्छीमारांची अवस्था, औद्योगिकीकरणाचा फटका
उरण, ता. ५ (वार्ताहर)ः तालुका कधीकाळी मासेमारीचे मोठे क्षेत्र होते. १९८९ मध्ये जेएनपीए प्रकल्पाला सुरुवात झाली. बंदर विस्तारासाठी महाकाय जहाजांच्या घुसखोरीने मासळीच भेटत नसल्याची अवस्था पारंपरिक मच्छीमारांची झाली.
उरणमध्ये जेएनपीए प्रकल्पाला सुरुवात झाली. बंदराच्या विकासासाठी करंजा, आवरे, खोपटा परिसरात निर्माण झालेल्या करंजा बंदरातही मोठ्या प्रमाणावर भराव टाकून करंजा बंदर निर्माण केले गेले. दगडी कोळशाच्या मालवाहू जहाजांची रेलचेल वाढली. त्यामुळे जहाजांच्या मार्गातील गाळ काढण्यासाठी परिसरात वाढलेला यंत्राच्या वापरामुळे किनाऱ्यालगतच्या खाजण क्षेत्रात मासळी येण्याचे बंद झाले. तर भरावामुळे पाण्याचे प्रवाह बंद झाल्याने मासेमारीसाठी जावे कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
---------------------------------------
उपजीविकेचे साधन हिरावले
- अटल सेतू, शेतीमुळे परिसरातील मच्छीमारी धोक्यात आली आहे. त्यात करंजा-रेवस पुलाची निर्मिती होत आहे. औद्योगिकीकरणाने समुद्रातून मासेमारीतून उपजीविकेचे साधनच हिरावून घेतले आहे.
- जहाजांचा वावर वाढल्याने त्यातून सांडणाऱ्या ऑइलमुळे किनाऱ्यालगतचा परिसर प्रदूषित झाला आहे. पारंपरिक मच्छीमारांना मिळणारी मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या तुलनेत किनाऱ्यावरील मासळीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
- मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी, अशी परिस्थिती सध्या पारंपरिक मासेमारी करण्याची झाली आहे. कधी कधी केलेला खर्च ही निघत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
--------------------------------------
प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर
जेएनपीएच्या बंदरानंतर समुद्रकिनारी असणाऱ्या ओएनजीसी कंपनीचे दूषित पाणी समुद्रात सोडल्यामुळे मत्स्यबीज वाढ होत नसल्याने प्रमाण घटले आहे. त्यामुळे पापलेट, सुरमई, हलवा, शेवंड, जिताडा, कोळंबी, चिंबोरी, बोइट, वांब, किळशी, खरबी, निवटी, खुबे, शिपलीसारखी किनाऱ्यालगत सापडणाऱ्या माशांच्या प्रजातीच धोक्यात आल्या आहेत.
------------------------------------------------------
तीनशे बिगर यांत्रिक बोटी
न्हावा खाडी, शिवाजीनगर, गव्हाण, कोपर, बेलपाडा, जसखार, करल, सोनारी, सावरखार, पाणजे, फुंडे, डोंगरी, मोरा, भवरा, हनुमान कोळीवाडा, नागाव केगांव, करंजा, मुळेखंड, आवरे, गोवठने, पाले खोपटा, पिरकोन, वशेणी, कोप्रोली, मोठी जुई, कळंबुसरे, दिघोडे, चिरनेर, विंधने, बोरखार, धाकटी जुई, धुतूम, नवघर, पागोटे, कुंडेवहाळ, पागोटे, भेंडखळ आदी गावांतील मच्छीमार पारंपरिक व्यवसाय करीत असून जवळपास तीनशे बिगर यांत्रिक बोटी आहेत.
-------------------------------
समुद्रात बंदर उभारणी, वाहतुकीसाठीचे पूल बांधण्यात आले आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात समुद्रात भराव झाला. मच्छीमारांचे खाजण क्षेत्र महाकाय जहाजांच्या घुसखोरीने मासे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानभरपाई दिली पाहिजे.
- गौरव कोळी, माजी सरपंच, हनुमान कोळीवाडा
-----------------------------------
कोणताही प्रकल्प आला, की मच्छीमारांना नुकसानभरपाई दिली जाते. अटल सेतूबाधित मच्छीमारांना बायोमेट्रिक कार्ड तसेच बोटी असलेल्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. रेवस-करंजा पूलबाधित मच्छीमारांचीदेखील यादी तयार केली जात आहे.
- सुरेश बाबुलगावे, परवाना अधिकारी
--------------------------------------
जेएनपीए बंदर होण्याअगोदर मोठ्या प्रमाणात पापलेट, हलवा असे मासे मिळत होते; परंतु आता भराव झाल्यामुळे मासळी बघायला मिळत नाही. शासनाने दुर्लक्ष केल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
- नीलेश पाटील, मच्छीमार, भुईवाडा उरण
----------------------------
दिवसभराची मिळकत
पूर्वी - १,५०० ते २,००० रुपये
आता - ४०० ते ५०० रुपये
---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com