नैसर्गिकरित्या मूर्ती विसर्जन बंदीने पेच
भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सहा फुटांपर्यंतच्या पीओपी गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक असल्याचे आतापर्यंत मानले जात होते; मात्र राज्य सरकारच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच केले जाईल, याची खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहा फुटांच्या आतील मातीच्या गणेशमूर्तींचे विसर्जनही नैसर्गिक तलावात करण्यास बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मिरा-भाईंदरमध्ये दरवर्षी सहा फुटांपर्यंतच्या सुमारे २० हजार मूर्तींचे विसर्जन पार पडते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात कसे करायचे, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
पीओपी गणेशमूर्तींचे नैसर्गिक पाण्यात विसर्जन केल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याच्या संदर्भातील याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सहा फुटांपर्यंतच्या सर्व पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच केले जाईल, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने सहा फुटांवरील मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक पाण्यात करण्याची मुभा दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य सरकारने गणेशमूर्ती विसर्जनासंदर्भात नुकताच एक आदेश जारी केला आहे. त्यात राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच केले जाईल, याची खबरदारी घ्यायची आहे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या आदेशांवरून सहा फुटांपर्यंतच्या पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठीदेखील नैसर्गिक तलाव व खाड्या बंदच राहणार आहेत. मातीच्या मूर्तीदेखील कृत्रिम तलावातच विसर्जित होतील, हे स्पष्ट झाले आहे; मात्र यावरून महापालिका प्रशासनासमोर नवाच पेच उभा राहिला आहे.
मिरा-भाईंदरमध्ये दरवर्षी १९ नैसर्गिक तलाव व खाड्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन पार पडते. गेल्यावर्षी संपूर्ण गणेशोत्सवात सुमारे २१ हजार मूर्तींचे विसर्जन पार पडले. त्यापैकी सुमारे एक हजार मूर्ती सार्वजनिक गणेशोत्सवातील म्हणजेच सहा फुटांवरील होत्या. उर्वरित १९ हजारांहून अधिक गणेशमूर्ती सहा फुटांच्या खालील होत्या. आता उच्च न्यायालय व राज्य सरकारच्या आदेशानुसार या सर्व म्हणजेच १९ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच पार पडणार आहे.
कृत्रिम तलावांची क्षमता वाढवावी लागणार
सुरुवातीला न्यायालयाच्या आदेशांनुसार या कृत्रिम तलावात केवळ पीओपीच्या मूर्तीच विसर्जित होतील, असे गृहित धरून प्रशासनाने तयारी सुरू केली होती. त्यानुसार मिरा-भाईंदर महापालिकेने यावर्षी ३१ कृत्रिम तलाव बांधण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र सरकारच्या आदेशांनुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित होणार असल्याने त्यांची क्षमता त्यानुसार करावी लागणार आहे.
प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण
विसर्जनादरम्यान वेळोवेळी विसर्जित झालेल्या मूर्ती कृत्रिम तलावातून काढून अन्य मूर्तींच्या विसर्जनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. हे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्याचा यंत्रणेवर मोठा ताण येणार असून पुरेसे मनुष्यबळ व अन्य सोयीसुविधा महापालिकेला तैनात ठेवाव्या लागणार आहेत.
राज्य सरकारकडून जारी झालेल्या आदेशांनुसार सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्ती केवळ कृत्रिम तलावातच विसर्जित होणार आहेत. त्यानुसार यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.