पाणी दरवाढीची टांगती तलवार
उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी पाणी दरवाढ रद्द केल्याचा दावा केल्यानंतर अवघ्या २४ तासांत महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या लेखी आदेशाने हा दावा फोल ठरला. आदेशात पाणी दरवाढ केवळ स्थगित केल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांच्या डोक्यावर दरवाढीची टांगती तलवार कायम आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे.
भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, माजी नगरसेवक जमनु पुरुस्वानी आणि महेश सुखरामानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याची दरवाढ रद्द केल्याचा तोंडी आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याची घोषणा केली. मात्र, बुधवारी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाण्याच्या दरवाढीला फक्त स्थगिती देण्यात येत आहे. याचा अर्थ असा की, महापालिका अद्याप दरवाढ रद्द करण्याच्या भूमिकेवर आलेली नाही. ही स्थगिती तात्पुरती असून, भविष्यात दरवाढ पुन्हा लागू होण्याची शक्यता अजूनही कायम आहे, असे जाहीर केले आहे.
प्रत्यक्षात कोणताही लेखी आदेश नसल्याने भाजपचा दावा केवळ राजकीय स्टंट असल्याचे दिसून आले आहे. आयुक्तांनी दिलेला स्थगिती आदेश म्हणजे फक्त तात्पुरता उपाय आहे. त्यामुळे नागरिकांना आता केवळ कृतीवर विश्वास ठेवावा लागणार आहे.
अन्य मुद्द्यांवर मौन का?
पाण्याच्या दरवाढीप्रमाणेच शहरातील खड्डेमय रस्ते, नवीन मालमत्ता कर असेसमेंटसाठी नियुक्त कंपनी, पाण्याची मीटर जोडणी, साफसफाईतील ढिसाळ कारभार आणि पाणीपुरवठ्यातील अनियमितता या सर्व गंभीर प्रश्नांवर भाजपचे स्थानिक नेते अद्याप मौन बाळगून आहेत. जनतेच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करून फक्त राजकीय लाभासाठी गोंधळ उडवण्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.