अनाथ बालकांना हवा मायेचा पदर

अनाथ बालकांना हवा मायेचा पदर

Published on

अनाथ बालकांना हवा मायेचा पदर
वर्षभरात केवळ आठ मुलांना मिळाले पालक; कायदेशीर प्रक्रिया किचकट व वेळखाऊ
अलिबाग, ता. ११ (वार्ताहर) ः दत्तक मुलांसाठी नागरिकांची मानसिकता सकारात्मक होत आहे. अनेक जोडपी आता मूल दत्तक घेण्यास इच्छुक आहेत. पण ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याने आजही अनेक अनाथ बालके हक्काच्या घरापासून वंचित आहेत. रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात केवळ आठ मुलांना पालक मिळाले आहेत, तर ३८६ पालक प्रतीक्षेत आहेत.
मूल होण्यासाठी उपलब्ध वैद्यकीय तपासण्या, इतर उपाय खर्चीक असल्याने त्यापेक्षा मूल दत्तक घेण्याकडे पालकांचा कल वाढल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे दत्तक विधान आणि बाल न्याय कायद्याबद्दल जागरूकता वाढत आहे. त्यामुळे अनेक पालक एखादे मूल दत्तक घेऊन त्यालाही हक्काचे घर मिळवून द्यावे, असा विचार करीत आहेत. सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी (केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण)द्वारे ही प्रक्रिया पार पाडली जाते. या प्रक्रियेमध्ये अनेक कायदेशीर टप्पे पार पाडावे लागत असल्यामुळे तीन ते चार वर्षांचाही कालावधी लागतो. त्यामुळे गेल्या वर्षभरात केवळ आठ मुले दत्तक देण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्यात सहा बालगृहे व दत्तकगृहे आहेत. यापैकी एक निरीक्षणगृह, चार स्वयंसेेवी बालगृहे व एक विशेष दत्तकगृह आहे. या सर्वांमध्ये एकूण १९६ मुले आहेत.

लहानग्यांना दत्तक घेण्याकडे कल अधिक
जिल्ह्यात दत्तक घेण्यासाठी मुले व मुलींनाही पसंती आहे. विशेषतः एक ते दीड वर्षाच्या मुला-मुलींना दत्तक घेण्याकडे कल अधिक आहे. लहानपणीच त्यांना दत्तक घेण्यासाठी पालक पसंती दर्शवितात. मूल दत्तक देताना बालक व पालक अशा दोघांचेही समुपदेशन केले जाते. मूल दत्तक दिल्यानंतर किमान दोन वर्षे बारकाईने तपासणी करण्यात येते, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी दिली.

प्रक्रियेला जास्त कालावधी
दत्तक मुलांसाठी अनेकदा बराच कालावधी लागतो. काही वेळा तीन ते चार वर्षांपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागते. दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक कायदेशीर औपचारिकता आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. दत्तक प्रक्रियेत काही प्रमाणात खर्च येतो, ज्यामध्ये नोंदणी शुल्क, गृहअभ्यास अहवाल शुल्क आणि बालसंगोपन शुल्क इत्यादींचा समावेश असतो.

सध्या समाजात मूल दत्तक घेण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. मात्र कायदेशीर प्रक्रिया थोडी किचकट आहे. यामुळे तीन ते चार वर्षांचा कालावधी लागतो, मात्र पालक सहकार्य करतात. अजूनही दत्तक कायद्याबाबत अनेक पालकांमध्ये अनभिज्ञता आहे. त्यामुळे त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे.
- वरदा मेहेंदळे, संचालिका, वात्सल्य ट्रस्ट, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com