थोडक्यात बातम्या रायगड
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांंना बस भेट
खालापूर (बातमीदार) ः तालुक्यातील कलोते धरण परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची तालुक्याला शाळेसाठी होणारी धावपळ, पायपीट आता थांबली आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी विद्यार्थ्यांसाठी ५० आसनी बस मोफत उपलब्ध करून दिली आहे. खालापूर तालुक्याचे ठिकाणी असलेल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर खालापूर येथे कलोते ग्रामपंचायतीमधील वाडी वस्तीवरील आदिवासी मुले विद्यार्जनासाठी येतात. कलोते मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असले तरी वाडीवस्तीवरून दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून एसटीसाठी यावे लागते. त्यानंतर वेळेवर बस येईल याची शाश्वती नसल्याने शाळेचे महत्त्वाचे तास वाया जाणे असे प्रकार नेहमी घडत. यामुळे विद्यार्थी गळतीचे प्रमाण देखील वाढत होती. या समस्येबाबत पालकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सुधीर ठोंबरे यांच्या समोर व्यथा मांडली. ठोंबरे यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे विद्यार्थ्यांना कलोते ते खालापूर ने-आण करण्यासाठी वाडीपासून बसची सोय करावी, अशी मागणी केली. आदिवासी ठाकूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मालू निरगुडे, खालापूर तालुका आदिवासी ठाकूर संघटनेचे नारायण निरगुडे, माजी विद्यार्थी राम शिगंवा यांनी बससाठी पाठपुरावा सुरू ठेवला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आमदार बालदी यांनी नवीन बस दिली. शिवाय बससाठी लागणारे डिझेल, चालक याचा खर्च देखील आमदार करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बस शाळेच्या स्वाधीन करण्यात आली.
.................
ब्राह्मण मंडळाकडून आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध
रोहा (बातमीदार) ः गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी ब्राह्मण समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा गुरुवारी (ता.१४ ) रोजी ब्राह्मण मंडळ रोहातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. रोह्याच्या ऐतिहासिक राम मारुती चौकात आमदार भास्कर जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करणारे पत्र ब्राह्मण मंडळ रोहातर्फे उपविभागायीय अधिकारी रोहा व पोलिस प्रशासनाला देण्यात आले. यावेळी राम मारूती चौकात ब्राह्मण मंडळ सचिव निखिल दाते, कमिटी सदस्य ॲड. प्रतीक पाटणकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्राह्मण मंडळ अध्यक्ष अमित आठवले, सचिव निखिल दाते, स्वाती पेंडसे, स्मृती जोशी, राजश्री आठवले, गिरीश पेंडसे, चंद्रशेखर जोशी, सुमित रिसबूड, प्रतीक पाटणकर, प्रज्वल बापट, जयेश गोडबोले, मृणाल पेंडसे, मानसी दाते, चिंतामणी गोडबोले, सचिन आठवले, प्रकाश जोशी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
................
माणगाव नगरपंचायतीच्या नामनिर्देशित नगरसेवकपदी शशिकांत मोहिते
माणगाव (बातमीदार) ः माणगाव नगरपंचायतीच्या नामनिर्देशित नगरसेवकपदी साईनगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते शशिकांत परशुराम मोहिते यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्याकडून त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. निवड झाल्यानंतर साईनगर रहिवासी मित्रमंडळाने साईनगर गणेशोत्सव मंडपात शशिकांत मोहिते यांचे जल्लेषात स्वागत केले. बिगर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यप्रवण असे शशिकांत परशुराम मोहिते यांची ओळख आहे. अतिशय गरीब घरातून सामजिक कार्यात सक्रीय सहभाग आणि नेतृत्व करणारा युवा कार्यकर्ता म्हणून शशिकांत मोहिते यांची ओळख आहे. साईनगर रहिवासी मित्रमंडळ आणि साईनगर गणेशोत्सव मंडळ, नवरात्रोत्सव आदी कामात शशिकांत मोहिते हे सक्रीय सहभाग नोंदवत असतात. यावेळी पत्रकारांशी बोलताना शशिकांत मोहिते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन व साईनगरसाठी स्वतःला झोकून देऊन काम करेन. तसेच प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण केले जाईल, असे मत व्यक्त केले आहे.
...............
भारतीय जनता पक्षाची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
कर्जत (बातमीदार) : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सुरू असून जिल्हा पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी यांनी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये चार सरचिटणीस (महामंत्री), आठ उपाध्यक्ष, आठ चिटणीस एक कोषाध्यक्ष व इतर कार्यकारी सदस्य अशी ९० जणांची घोषणा केली. यामध्ये ३३ टक्के महिला पदाधिकारी, एससी, एसटी, पदाधिकारी यांनादेखील पक्षाच्या घटनेप्रमाणे पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. जिल्ह्याचे सरचिटणीस यांना कायम ठेवण्यात आले आहे. सरचिटणीस म्हणून कर्जतमधील दीपक बेहेरे, नगरसेवक नितीन पाटील पनवेल, नगरसेवक प्रकाश बिनेदार नवीन पनवेल, पनवेल महापालिकेच्या माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत यांना संधी दिली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून सुधीर ठोंबरे खालापूर, अश्विनी पाटील खोपोली, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, प्रल्हाद केणी, चंद्रकांत घरत, गणेश कडू, मयुरेश नेतकर व समीर कदम यांना संधी दिली आहे. त्यांना सहाय्य करण्यासाठी चिटणीस म्हणून नितीन कांदळगावकर कर्जत, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील खालापूर, रवीनाथ पाटील, शरद ठाकूर, विद्या तामखेडे, विनिता घुमरे, सायली म्हात्रे, शामला सुरेश त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे कोषाध्यक्षपदी अभिलाशा ठाकूर यांना कायम ठेवण्यात आले आहे. त्यासह नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांना कार्यकारिणी सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे. उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची १७ मंडल, तीन विधानसभा आणि चार तालुक्यांमध्ये विभाजित झाली आहेत. पक्षाच्या सूचनेप्रमाणे सर्व मंडले, सर्व विधानसभा व सर्व समाज घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यानंतर लगेचच विविध आघाड्या, सेल व प्रदेश सदस्य जाहीर करण्यात येतील.
...............
जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणाला शिर्की ग्रामस्थांचा पाठिंबा
पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीचा होत असलेला अधिकचा विस्तार फेज ३ पाहता येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विस्तारीकरणाला आणि होणा-या जनसुनावणीला शिर्की गावातील काही ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जेएसडब्लू कंपनीच्या माध्यमातून शिर्की भागातील खारेपाट भागात आजपर्यंत कंपनीने अनेक विकासात्मक कामे केली आहेत. येथे पाण्याची पाईपलाईन आणली असून तलावातील गाळ काढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अधिकचा पाणी पुरवठा वापरण्यासाठी मिळत आहे. नव्याने आंबेवाडी, सागरवाडी, शिर्की चाळ १ या तीन ठिकाणी स्मशानभूमी बांधल्या, अंतर्गत रस्ते तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून हर घर हर नळ ही योजना आली. मात्र येथे पाण्याची टाकी नसल्याने त्याठिकाणी जवळपास कंपनीने दीड लाख लिटर पाण्याची टाकी बांधून दिली. शाळेसाठी शौचालय बांधले. त्यामुळे कंपनीचा विस्तार होणे गरजेचे असून यामुळेच येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तर या भागातील काही तरुण कंपनीच्या भिल्लारी प्लांटमध्ये काम करत आहेत; मात्र तेथील कार्यकाळ संपल्यावर तरुणांना येथे कंपनीने सामावून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला येथील महिला वर्गासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
.................