तिरंगा यात्रा-रॅलीत शक्तिप्रदर्शन
उल्हासनगर, ता. १६ (बातमीदार) : कट्टर कलानी समर्थक म्हणून ओळखला जाणारा उल्हासनगरातील एस. एस. ग्रुप फाउंडेशन ग्रुप कलानीपासून विभक्त झाल्यानंतर आणि भाजपात प्रवेश घेतल्यानंतर स्वातंत्र्यदिनी तिरंगा यात्रा व दुचाकी रॅली काढत दमदार शक्तिप्रदर्शन केले. रॅलीत आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष नाना बागुल, जिजाऊ सावित्री रमाई प्रतिष्ठानचे मनोज शेलार आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.
एस. एस. फाउंडेशनच्या अध्यक्षा सुचित्रा सुधीर सिंह, संजय सिंह (चाचा), हेमा पिंजानी व प्रेम झा यांच्या पुढाकाराने काढलेल्या रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले. ठिकठिकाणी देशभक्तीपर घोषणा, तिरंगा ध्वज आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. रॅलीची सुरुवात चंद्रशेखर आजाद शाळा येथून झाली. आजादनगर चौक, अमरधाम चौक, म्हारळ नाका, शहाड, चोपडा कोर्ट, महापालिका, शिवाजी चौक, फारवर्ड लाईन, मध्यवर्ती पोलीस ठाणे या मार्गे परत आजाद नगर येथे सांगता झाली.