ठाणे पालिका प्रशासनाचे आडमुठे धोरण
ठाणे पालिका प्रशासनाचे आडमुठे धोरण
भाजपसह अजित पवार गट आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : मागील अडीच ते तीन वर्षांपासून ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीत पालिका प्रशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपसह अजित पवार गटाला स्थानचा दिले जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही घटक पक्षांच्या नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेला फाटा देत केवळ एकाच पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले जात असल्याचे सांगत ही बाब दुर्दैवी असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून म्हटले जात आहे.
गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू आहे. या राजवटीच्या काळात प्रशासनाकडून शहरातील विविध वस्तूंचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येत आहे. त्यातच महापालिकांच्या निवडणुकांचेदेखील बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतील नेते व लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत. महापालिकांच्या निवडणुकीतदेखील महायुती म्हणून निवडणुका लढविण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत. असे असले तरी नुकताच ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनच्या नूतनीकरण वस्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी गडकरी रंगायतनच्या कार्यक्रमाला भाजपचे आमदार उपस्थित होते, परंतु जिल्हा अध्यक्षांना फोनवरून निमंत्रण दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे उद्घाटनानंतर त्यांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. तर मॅरेथॉन स्पर्धेला केवळ सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीच अधिक संख्येने उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले. या वेळीदेखील अजित पवार गट किंवा भाजप या ठिकाणी दिसून आले नव्हते. यावरून महायुतीतील घटक पक्षांना शहरातील भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यापासून दोन हा लांबच ठेवल्याचे चित्र दिसून येत आहे.
कोट
पूर्वी सर्वपक्षीय जिल्हाध्यक्षांना कार्यक्रमाचे पालिका प्रशासनाकडून निमंत्रण देण्यात येत होते. मात्र सध्या प्रशासकीय राजवट सुरू असल्याने त्यांचा कारभार सुरू आहे. जेव्हा सभागृह येईल तेव्हा त्यांना उत्तर दिले जाईल; मात्र प्रशासनामागे अदृश्य हात कोणाचे आहेत, हे पाहावे लागणार आहे.
- संदीप लेले, जिल्हा अध्यक्ष, ठाणे शहर भाजप
कोट
आयुक्त सौरभ राव हे महापालिकेचे प्रशासक असून, ते मनमानी पद्धतीने आपला कारभार चालवित आहेत. कुठल्याही विकासकामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण होत असताना सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आणि जिल्हा अध्यक्षांना निमंत्रण दिले जात होते. सध्या या प्रथेला हरताळ फासत महायुतीतील केवळ शिंदे सेनेला बोलावले जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.
- आनंद परांजपे, प्रवक्ते, अजित पवार गट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.