चौदा गावांचा निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेत समावेश

चौदा गावांचा निवडणूक प्रारूप प्रभाग रचनेत समावेश

Published on

१४ गावांचा निवडणूक प्रारूप प्रभागरचनेत समावेश
ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण; पालिका निवडणुकीत मतदानाची संधी
वाशी, ता. २६ (बातमीदार) ः राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेने आगामी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. नव्या प्रभागरचनेनुसार २८ प्रभागांतून १११ नगरसेवक नवी मुंबई महापालिकेत असणार आहेत. नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांना पुन्हा समाविष्ट करण्यात आले असून, या १४ गावांचा निवडणूक प्रारूप प्रभागरचनेत समावेश करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांनी आपल्याला नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना आता प्रारूप प्रभागरचनेत समाविष्ट करण्यात आल्याने पालिकेच्या निवडणुकीत त्यांना मतदानाची संधी मिळणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रभागरचना प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोग आणि शासनाकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या प्रभागरचनेनुसार २८ प्रभागांत १११ नगरसेवक असणार आहेत. या प्रभागरचनेवर ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविता येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, महापालिकेत १४ गावे समाविष्ट करण्यात आल्याने महापालिकेतील १११ या सदस्यसंख्येत वाढ होईल, असे अपेक्षित होते. मात्र पालिकेने सीमांकन वाढवून १११ सदस्यसंख्या कायम ठेवत वगळलेल्या १४ गावांना प्रारूप प्रभागरचनेत समाविष्ट केले आहे. महापालिकेत अ, ब, क, ड मिळून एक प्रभाग निश्चित करण्यात आला आहे. प्रभागरचनेत समाविष्ट केल्याने १४ गावांतील स्थानिक प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
...........
२५ वर्षे विकासापासून वंचित असलेल्या १४ गावांना पालिकेत सामावून न्याय दिला आहे. त्यानंतर १४ गावांतील नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रारूप प्रभागरचनेत समाविष्ट करून त्यांना मतदानाचा संविधानिक अधिकार मिळवून दिला आहे. त्याबद्दल महायुती सरकार आणि पालिका आयुक्तांचे आभार मानतो, असे १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीचे सहसचिव बबलू येंदारकर यांनी सांगितले.
............
नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष पेटणार
वनमंत्री गणेश नाईक यांनी १४ गावांचा नवी मुंबई समावेश करताना त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला तरच या गावांना समाविष्ट करून घेऊ, अशी भूमिका घेत विरोध दर्शविला होता. मात्र महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप नेते व मंत्री नाईकांची मागणी धुडकावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार निवडणूक प्रारूप रचनेतही १४ गावे समाविष्ट केली आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत शिंदे विरुद्ध नाईक असा संघर्ष पाहावयास मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com