स्वप्नातील इमले मृत्यूचे सापळे!

स्वप्नातील इमले मृत्यूचे सापळे!

Published on

वसई, ता. ८ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका दरवर्षी अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. त्या इमारती खाली करण्यासाठी संबंधितांना नोटिसा दिल्या जातात, मात्र अनेक रहिवासी जीव मुठीत धरून इमारतीत राहतात. त्यामुळे अनेकदा पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडतात. या जीर्ण इमारती मृत्यूचे सापळे बनत आहेत, हे गेल्या महिन्यातील दुर्घटनेमुळे समोर आले. शहरातील अनेक इमारतींना तडे गेले आहेत. त्यांचे स्लॅब कोसळत आहेत. शहरातील नादुरुस्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

वसई-विरार शहरात अनेक धोकादायक इमारतींमध्ये रहिवासी वास्तव्य करतात. ऑगस्टमध्ये इमारतीचा भाग कोसळून १७ नागरिकांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. मंत्री, पालकमंत्र्यांनी भेटी दिल्या व महापालिका प्रशासनाला अशा इमारतींवर कारवाई करा, नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी मोहीम राबवा, अशा सूचना केल्या. यंदा पावसाळ्यात अशा पाच घटना घडल्या आहेत. यात स्लॅब, इमारतीचा काही भाग कोसळत असल्यामुळे जीर्ण इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करीत आहेत, हे समोर येत आहे.

एकीकडे अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, इमारती बांधताना कोणतेही नियोजन नाही, सुविधांचे प्रलोभन दाखवल्याने सर्वसामान्य ग्राहक बळी पडून अशा इमारतीत स्वप्नाचे घर समजून वास्तव्य करतात, परंतु निकृष्ट दर्जाचे बांधकाम काही काळानंतर धोकादायक ठरते. अशा अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्या केव्हाही कोसळू शकतात, तरीही नागरिक घर सोडण्यास तयार होत नाहीत. स्लॅबच्या सळ्या बाहेर निघालेल्या, गंजलेल्या अवस्थेत आहेत. हळूहळू स्लॅब पडत आहेत. परिणामी त्याची देखभाल करणेदेखील जिकिरीचे झाले आहे. त्याची पर्वा न करता रहिवासी जीव धोक्यात टाकत आहेत.

विरार येथे घडलेली दुर्घटना पाहता ही इमारत नादुरुस्त होती, मात्र रहिवासी वास्तव्य करीत होते. पावसाळ्यात घडलेल्या दुर्घटनेनंतर मंत्र्यांनी केलेली पाहणी, सरकारने घेतलेली दखल पाहता वसई-विरार महापालिकेने गंभीर पाऊल उचलून अशा नादुरुस्त इमारतींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पुढील काळात जीर्ण इमारती जमीनदोस्त करण्यासाठी उपक्रम राबवला जाणार आहे.

नोटिसा दिल्यानंतर लेखा परीक्षणाचे काय?
महापालिका प्रशासन इमारतींचे विविध गटांत वर्गीकरण करते. त्यानंतर संबंधित इमारतींना नोटीस बजावण्यात येते. त्यांचे लेखा परीक्षण करण्याचे सूचित करण्यात येते, परंतु त्यांनी लेखा परीक्षण केले की नाही, याबाबत पडताळणी करणे गरजेचे आहे.

चालू वर्षातील अपघात
१९ जून नालासोपारा पूर्वेतील बावशेत पाडा येथील श्री कृष्ण चाळीची भिंत कोसळली
५ जुलै अलंकापुरी येथील साईराज इमारतीला तडा
२६ ऑगस्ट रमाबाई इमारत दुर्घटनेमध्ये १७ जणांचा मृत्यू, ९ जखमी
२ सप्टेंबर नालासोपारा पूर्वेतील नादुरुस्त इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर
७ सप्टेंबर विरारमधील श्री गणेश इमारती स्लॅब कोसळल्याने दोन जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com