गणेशोत्सवानंतर साथीच्या आजारांमध्ये वाढ
पावसाने आरोग्याशी खेळ
गणेशोत्सवानंतर डेंगी, सर्दी-तापाने नागरिक हैराण; जिल्हा रुग्णालये हाउसफुल्ल
अलिबाग, ता. ९ (वार्ताहर)ः गणेशोत्सवाच्या धामधूमीनंतर जिल्ह्यात डेंगी, सर्दी-तापासारख्या साथीच्या रोगांचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे साचलेले पाणी, कचऱ्याने साथीचे आजार बळावले असून, जूनपासून सुरू असलेल्या पावसाचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंगी, मलेरिया, सर्दी-ताप, खोकल्यासारखे साथीचे आजार बळावतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आधीच औषधांचा पुरेसा साठा, अतिरक्त बेडची व्यवस्था करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्याचप्रमाणे कचऱ्याचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे डासांची उत्पत्तीमुळे डेंगी, ताप-सर्दीसारखे आजार बळावले आहेत. अशातच गणेशोत्सवातील धावपळीनंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन वारंवार ताप येणे, सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या, मळमळ अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची वाढ झाल्याने जिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.
-----------------------------------------
लहान मुलांना सर्वाधिक धोका
आतापर्यंत डेंगीचे ३७ रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात योग्य उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे, तर लेप्टोचे १४ रुग्ण आढळले असून, सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. लेप्टोच्या १४ रुग्णांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे, तर सर्दी-तापाचे ३४९ रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून, लहान मुलांची संख्या तब्बल १५५ एवढी आहे.
-----------------------------
रुग्णसंख्येचा तपशील
प्रकार एकूण रुग्ण लहान मुले
डेंगी ३७ १
लेप्टो १४ २
सर्दी-ताप ३४९ १५५
------------------------------------
काळजी घेण्याचे आवाहन
पावसाळी वातावरणात ताप-सर्दी आणि खोकल्यासह इतर संसर्गजन्य आजारांची लागण अनेकांना होते. यातच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना तापाचा प्रादुर्भाव तत्काळ होतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. साथीच्या आजारांमध्ये आवश्यक काळजी घेत उपचार घ्यावे, आजार अंगावर काढू नये. परिसरातील अस्वच्छता प्रामुख्याने आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरतात. घराप्रमाणे इतर परिसर स्वच्छ ठेवल्यास अशा आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.
--------------------------------------
रुग्णालयात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभाग सतर्क असून, उपचारासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे. रुग्णालयात औषधांचाही पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. साथीच्या आजारांचा संसर्ग पाण्यातून होतो. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून पिणे, पाणी साठवून ठेवण्याच्या जागा वेळोवेळी स्वच्छ करणे, अशी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. शीतल जोशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.