ग्रामस्थांचा पाण्यासाठी संघर्ष!
तारवाडीच्या ग्रामस्थांचा पाण्यासाठी संघर्ष
झऱ्याचे पाणी हंड्यात भरण्यासाठी महिलांची तारेवरची कसरत
मोहिनी जाधव :
बदलापूर, ता. ९ : शहारापासून साधारण आठ किमी अंतरावरील कोंडेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या तारवाडी आणि इतर काही आदिवासीवाड्यांमध्ये स्वातंत्र्याची ७७ वर्षे लोटूनसुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पावसाळा असल्याने डोंगरावरून वाहत्या झऱ्याचे पाणी शेताच्या भागात अडवून स्वयंपाकघरातील डवल्याने हंड्यात भरण्याची वेळ इथल्या महिलांवर आली आहे. काहींच्या दारात नळ आणि जलकुंभ आली आहेत; मात्र त्यात पाणीच नसल्याने, नळांना गंज लागून ती अशीच भंगारात गेली आहेत.
बदलापूरपासून अगदी आठ किमी अंतरावरील कोंडेश्वरसारख्या धार्मिक आणि पर्यटनस्थळाची महती पंचक्रोशीत आहे; मात्र इथल्या आदिवासी ग्रामस्थांची आजही मूलभूत गरजांसाठी परवड होत आहे. स्वातंत्र्याची ७७ वर्षे ओलांडली तरीही पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे. गावात, वाडीत नळ योजना नसल्याने, जुन्या विहिरी किंवा पावसाळ्यात झऱ्याचे वाहणारे पाणी गोळा करून इथले ग्रामस्थ आपली तहान भागवत आहेत. तारवाडी, भोजवाडी इथल्या ग्रामस्थ महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.
सध्या पावसाळा सुरू असल्याने, कोंडेश्वरच्या डोंगरातून तयार होणारे नैसर्गिक धबधबे, झरे यांचे शेतातून जाणारे पाणी अडवून, स्वयंपाकघरातील डवल्याचा (वाडगे) वापर करण्यासाठी करून, चाळणीतून गाळून ते पाणी घरातील इतर वापरासाठी आणि पिण्यासाठी वापरण्याची वेळ या महिलांवर आली आहे. तारवाडी आणि भोजवाडी या दोन्ही वाड्या दहिवली ग्रामपंचायत हद्दीत येतात, मात्र ग्रामपंचायतने काही भागांत नळ दिले, मात्र नळाला पाणी नाही, आमच्या तारवाडीत तर नळ योजनादेखील नाही. ग्रामपंचायत आमच्याकडे लक्षच देत नाही. त्यामुळे आम्ही पिढ्यानपिढ्या पाण्यासाठी हाच संघर्ष करत असल्याची तक्रार या महिलांनी केली आहे.
जबाबदारी ढकलण्यासाठी आरोप-प्रत्यारोप
दहिवलीच्या सरपंच कामिनी धुळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वाडीतील पाण्याची तक्रार आमच्यापर्यंत कधी आलीच नसल्याचे त्यांनी सांगितले, तर ग्रामसेवक गणेश खारीक यांनी शासनाच्या जलजीवन योजनेतून आम्ही या आदिवासी पाड्यात पाणीपुरवठा करण्यासंदर्भात अंबरनाथ तालुका तहसील कार्यालयात पाणीपुरवठा विभागात अनेकदा पत्रव्यवहार केला आहे; मात्र ठेकेदारांच्या कामचुकार वृत्तीमुळे आणि तहसील कार्यालयात संबंधित विभागातून आम्हाला अद्याप काहीही उत्तर मिळाले नसल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले, तर तहसील कार्यालयात संबंधित पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुदर्शन चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी तारवाडी व आजूबाजूच्या कोणत्याच पाड्यातील पाणी समस्येच्या तक्रारीबाबत पत्रव्यवहार केला नसल्याचे सांगितले. त्यामुळे स्वतःवरील जबाबदारी ढकलण्यासाठी व स्वतःच्या चुका लपविण्यासाठी हे लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी एकमेकांवर आरोप करत आहेत.
जलजीवन योजना रखडली
राज्य सरकारकडून निधी येत नसल्याने जलजीवन योजना रखडली आहे. ठेकेदारांना त्यांच्या खर्चाचे पैसे शासनाकडून मिळत नसल्याने ठेकेदारांनी ही कामे थांबवली आहेत. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुदर्शन चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जोपर्यंत शासनाचा निधी येत नाही आणि जलजीवन योजना सुरू होत नाही, तोपर्यंत आदिवासी बांधवांचा हा संघर्ष सुरूच राहणार आहे.
आमच्या सगळ्या पिढ्या या पाण्यासाठी हाच संघर्ष करत आहेत. ग्रामपंचायतने अद्यापही पाण्याची सोय आम्हाला करून दिलेली नाही. पावसाळ्यात आम्ही हे नैसर्गिक झऱ्याचे पाणी अडवून भरतो आणि हिवाळा आणि उन्हाळ्यात शेतात असलेल्या विहिरीतून पाणी भरतो.
गुलाब वाघे, ग्रामस्थ, तारवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.