पावसाळ्यातही घरकुले अपूर्णच
जव्हार, ता. १० (बातमीदार) : ग्रामीण आदिवासी अशी ओळख असणाऱ्या जव्हार तालुक्यात केंद्र, राज्य सरकार तथा सामाजिक संस्थांच्या निरनिराळ्या उपक्रमांतून येथील नागरिकांचे जीवनमान उंचावू लागले आहे; मात्र तालुक्यातील ४५ टक्के घरकुलांना आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने अद्यापही अनेक घरकुले अपूर्णच असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान आवास योजना ग्रामीणअंतर्गत जव्हार तालुक्यात ११ हजार ४८६ मंजूर झाली आहेत. त्यापैकी अनेक घरे आजही अपूर्ण आहेत. यामुळे गरजू कुटुंबांना घरांसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. तालुक्यात एका बाजूला घरांचे बांधकाम रखडले असताना, दुसऱ्या बाजूला नुकत्याच पार पडलेल्या ‘आवास प्लस’ सर्वेक्षणात सुमारे तीन हजारांहून अधिक नवीन अर्ज दाखल झाले आहेत, ज्यावरून तालुक्यात अजूनही मोठ्या संख्येने पात्र लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट होते.
२०१६-१७ ते २०२४-२५ मध्ये पंतप्रधान आवास योजनेत सुमारे पाच हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली; मात्र अनेक घरांचे काम अजूनही पूर्ण झाले नाही. घरकुलांच्या बांधकामाला विलंब होत असल्याने गरजू कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
सर्वेक्षणात सुमारे तीन हजार अर्ज दाखल
नुकत्याच पार पडलेल्या आवास प्लस सर्वेक्षणातून जिल्ह्यात जवळपास तीन हजारांहून अधिक नवीन पात्र कुटुंबांनी घरकुल मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. ही संख्या तालुक्यासाठी मंजूर असलेल्या घरांच्या संख्येच्या २० टक्के आहे, जी ग्रामीण भागात घरांची मोठी गरज असल्याचे दर्शवते.
उद्दिष्टपूर्ती न होण्याची कारणे
पंतप्रधान आवास योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना वेळेवर हप्त्यांमध्ये पैसे मिळत नसल्याने बांधकामात अडथळे येतात. तसेच, वाळू, सिमेंट, विटा यांसारख्या साहित्याचे दर वाढल्याने मंजूर निधी पुरेसा ठरत नाही.
घराचे काम अर्धवट थांबले
घरकूल बांधकामासाठी मिळालेला निधी पुरेसा नाही. बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे घराचे काम अर्धवटच थांबले आहे. सरकारकडून वेळेवर निधी मिळत नाही, त्यामुळे मजुरी देणेही शक्य होत नाही, असे लाभार्थी सांगतात. अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला; मात्र विविध कारणांनी अजूनही बहुतांश घरांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही.
जव्हार तालुका पंचायत समितीअंतर्गत घरकुल योजनेकरिता एक विशेष विभाग कार्यान्वित आहे, हा विभागच घरकुल विषय हाताळत आहे.
- डी. एस. चित्ते, गटविकास अधिकारी, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.