टिटवाळ्यात पिण्याच्या पाण्याची नासाडी
टिटवाळ्यात पिण्याच्या पाण्याची नासाडी
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया
टिटवाळा, ता. १० (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील टिटवाळा (पूर्व) येथील बाजपेयी चौकात पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचा व्हॉल्व्ह फुटल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या समस्येकडे पालिकेच्या जल विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या गंभीर समस्येमुळे परिसरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
टिटवाळ्यातील सम्राट हॉटेलपुढे असलेला पिण्याच्या पाण्याचा व्हॉल्व्ह काही दिवसांपूर्वी फुटल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे रस्त्यावर पाण्याचे डबके साचले असून, चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी पाणीपुरी आणि इतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या असतात. या गाड्यांवर येणारे ग्राहक साचलेल्या पाण्यात थुंकणे, उरलेले पाणी टाकणे आणि हात धुणे अशा प्रकारची अस्वच्छ कृत्ये करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. यामुळे दूषित आणि अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे.
वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष
याबद्दल स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या जल विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. नागरिकांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारी अर्जात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यात व्हॉल्व्हची कायमस्वरूपी दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी. तसेच पाणीपुरीच्या हातगाड्यांवर स्वच्छतेच्या नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी महापालिकेने तातडीने ठोस पावले उचलावीत, असेही नागरिकांनी म्हटले आहे.
प्रशासन कधी लक्ष देणार?
या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासन कधी लक्ष देणार आणि टिटवाळाकरांना या समस्येतून कधी मुक्ती मिळणार, हा प्रश्न पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती यांनी उपस्थित करीत याबाबत लवकरात लवकर पाहणी करून कार्यवाही करावी, अशा मागणीचे पत्र अ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले.
तीन वेळा दुरुस्ती, तरीही गळती कायम
याबाबत या विभागाचे उपअभियंता भदाणे यांना संपर्क केला असता जल विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा व्हॉल्व्ह तीन वेळा दुरुस्त केल्याचे सांगितले. मात्र ही दुरुस्ती तात्पुरती असल्यामुळे पुन्हा पाणी गळती सुरू झाली आहे, असे सांगितले. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.