कोंडी फुटेना स्वप्न उड्डाणपूलाचे!

कोंडी फुटेना स्वप्न उड्डाणपूलाचे!

Published on

वसई, ता. १० (बातमीदार) : वसई-विरार शहरातील पर्यायी मार्ग होणार असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर होईल, अशी ग्वाही जनतेला दिली जात आहे. प्रत्यक्षात मात्र रस्ते मार्गावरील कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. येथील प्रवाशांना भरदिवसा रस्त्यावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र या पुलाचे स्वप्न प्रत्यक्षात कधी साकार होणार, याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत.

वसई-विरार शहरांत खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहे. अशातच प्रमुख मार्गावर वाहतूक संथ गतीने होत आहे. नेहमीच कोंडी असणाऱ्या रस्त्यांना पर्याय उपलब्ध नाही. एकीकडे वसई-विरार शहरांत प्रमुख मार्गावर उड्डाणपुलांची निर्मिती करणार, अशी आश्वासने दिली जात आहेत, परंतु कार्यवाही अद्याप झाली नाही. औद्योगिक वसाहतीकडे जाणारा गोखिवरे, सातिवली, वालीव, गावराईपाडा, गोलानी मार्ग, वसई फाटा हा मार्ग कोंडीने व्यापला जात आहे. वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात असले तरी खड्डे आणि मार्गावरून धावणारी वाहनांना कोंडीचे विघ्न सतावत आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागातून कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात वसई-विरार शहरांत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत ये-जा करतात. कच्चा माल, पक्का माल ने-आण करणारी अवजड वाहनेदेखील धावतात, मात्र त्यांना अडसर निर्माण होतो. विरार पूर्व, नालासोपारा, तुळिंज, आचोळे, संतोष भुवन, पेल्हार, माणिकपूर यासह अनेक प्रमुख मार्गांवर कोंडी निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांसह सर्वसामान्यांना चालणेदेखील जिकिरीचे होते.

रस्ते अरुंद असल्याने पर्याय म्हणून उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे, असे लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र सद्य:स्थितीत कोंडीत अडकेलाला सर्वसामान्य प्रवासी घरी व कामावर जाण्यासाठी कोंडीत सापडला आहे.

उड्डाणपूल उद्‍घाटनाविना
नालासोपारा, विरार येथे प्रत्येकी एक, तर वसईत दोन उड्डाणपूल आहेत. मात्र यातील एक उड्डाणपूल नादुरुस्त असल्याने वाहतूक होत नाही. अन्य पुलावर कोंडी असते. नारंगी येथे उभारण्यात आलेला उड्डाणपूल अद्याप रहदारीसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे अधिकाधिक वाहतूक कोंडी होते.

महामार्गावर ‘जैसे थे’ परिस्थिती
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी कोंडी काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबई, ठाणे परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना वसई ते फाउंटन हॉटेलपर्यंत प्रवास अधिक वेळ खर्ची घालावा लागत आहे. त्यामुळे कोंडीमुक्त प्रवास कधी करता येणार याची वाट प्रवासी पाहात आहेत.

वाहतूक कर्मचारी तैनात करणार
ज्या मार्गावर कोंडी होते त्या ठिकाणी वाहतूक कर्मचारी तैनात करून कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. वर्दळीच्या मार्गावर वाहतूक सुरळीत असावी, यासाठी लक्ष दिले जात आहे, असे वाहतूक विभाग पोलिस निरीक्षक प्रशांत लांघी यांनी सांगितले.

वसई पूर्व भागात रस्ते नादुरुस्त आहेत. प्रचंड कोंडीचा सामना प्रवाशांसह प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना नेहमी बसतो. याकडे प्रशासनाने लक्ष घालून वाहतूक सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे.
- जयेंद्र पाटील, नागरिक

मुख्य रहदारीचे रस्ते कोंडीने व्यापले जात आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवांना वाट काढणेदेखील अवघड होत आहे. पर्यायी व्यवस्था नसून, रस्ते मार्गावर सारी मदार आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करावी.
- प्रफुल्ल पाटील, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com