जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम

जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम

Published on

अध्यक्षपदासाठी संघर्षाचा इतिहास; आरक्षणामुळे अनेकांच्या आशा पल्लवित
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात सर्वच जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या जाणार असून, रायगड जिल्ह्यात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. रायगड जिल्हा परिषदेवर नेहमी ठरावीक राजकीय कुटुंबीयांचे वर्चस्व राहिलेले असताना दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाने या पदावर कोण बसणार, याकडे येथील मतदारांचे आतापासूनच लक्ष लागून राहिले आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या गटासाठी आरक्षित असल्याने कोणत्याही गटातील व्यक्ती बसण्यास पात्र असेल. सध्याच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत कोणत्याच पक्षाचे निर्विवाद वर्चस्व नसल्याने कोणता पक्ष कोणाशी जुळवून घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अध्यक्षपदाच्या आरक्षणातून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुल्या) गटासाठी आरक्षित आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या सर्वच नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे अध्यक्षपदाची चुरस अधिकच वाढण्याची शक्यता आहे. यात नव्या दमाचे नवे नेतृत्व तयार होत असल्याने कोणत्याही गटातील पुरुष किंवा महिला उमेदवाराला या पदावर बसण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळेच ही चुरस अधिक वाढली आहे.

----
अध्यक्षपदावरून नेहमीच वादंग
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून नेहमीच वादंग होतो. २००४मध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अध्यक्षपदाच्या रस्सीखेचमुळे सुनील तटकरे यांना दोन वेळा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतरही माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत राज्य शासनाला कोंडीत पकडले होते. त्यानंतरही रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून नेहमी वादंग सुरू असतो. यापूर्वीच्या दोन टर्ममध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठी राखीव होत्या. त्यामुळे कविता गायकवाड, योगीता पादीर, अदिती तटकरे, ॲड. नीलिमा पाटील यांची वर्णी लागली होती. त्यानंतर प्रदीर्घ कालावधीने पुरुष अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
-----
अस्थिर राजकारणाने वाढणार चढाओढ
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षासह उबाठा शिवसेना, शरद पवार-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची जुळवाजुळव करीत निवडणुका लढविण्याची तयारी करीत आहे. मागील वर्षी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठी हार पत्करावी लागली. त्यांच्याविरोधात महायुतीतील शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपा निवडणुका लढण्यास सज्ज होत आहे.
-----

भाजप आक्रमक; कमकुवत शेकाप
आताच्या निवडणुकीत भाजपाने आक्रमक रणनीती वापरली आहे. आठ वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांमधील जास्तीत जास्त जागा जिंकून जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच विजय मिळवण्याची तयारी भाजपाचे राजकीय नेते करीत आहेत. एकेकाळी जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या शेतकरी कामगार पक्षातील अनेक नेते हे भाजपामध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष हा भाजपाचा असेल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे कमकुवत झालेला शेकाप कोणाची मदत घेणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
------
प्रशासकीय राजवटीचा सर्वाधिक कालावधी
२० मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषद बरखास्त झाली, तेव्हापासून जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. त्यापूर्वी १९९० ते १९९२ या काळात २२ महिने प्रशासकीय राजवट होती. हा विक्रम सध्याच्या प्रशासकीय कारभाराने मोडीत काढला आहे. १९९०मध्ये प्रभाकर पाटील यांच्या ११ वर्षांच्या अध्यक्षतेनंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली होती. ती २० मार्च १९९२ रोजी संपली.

Marathi News Esakal
www.esakal.com