खारघरमध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्‍कळीत

खारघरमध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्‍कळीत

Published on

खारघरमध्ये तुंबलेल्या पाण्यामुळे जनजीवन विस्‍कळित
खारघर, ता. १५ (बातमीदार) : खारघर सेक्टर १७, वास्तुविहार सोसायटीसमोरील रस्त्यावर पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे रहिवासी, विद्यार्थी आणि पालकांना मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याने रस्ते तुंबल्यावर अनेक वेळा विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावरील पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी पालिका प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना करावी, अशी मागणी स्‍थानिकांनी केली आहे.
येथील गृहनिर्माण सोसायटीजवळील बांधकाम व्यावसायिकांनी टॉवर उभारणी करताना रस्त्याच्या कडेला रेती, खडी, पाट आणि इतर बांधकाम साहित्य ठेवले आहे. यामुळे पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहू शकत नाही. या कारणास्तव रस्त्यावर तुंबलेले पाणी विद्यार्थ्यांसह रहिवाशांना अनेक अडचणी निर्माण करीत आहेत. रस्त्यापासून हाकेवरच व्हिबग्योर व संजीवनी इंटरनॅशनल शाळा आहेत. त्‍यामुळे परिसरात रोज विद्यार्थी आणि पालकांची मोठी वर्दळ असते. घाण पाण्यामुळे रोगराई होण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. स्थानिक रहिवासी तसेच शिवसेना कार्यकर्ते नंदू वारुंगसे यांचा दावा आहे, की खारघर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाणारे शहर असून, तिथल्या रस्त्यांवर पाणी तुंबू नये, यासाठी पालिकेने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. रस्त्याचे डिव्हर्जन, पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करण्यासाठी ड्रेनेज लाइनची सुधारणा, अवरोधक साहित्य काढणे यासारख्या तांत्रिक उपाययोजना करून या समस्येवर तत्काळ उपाय करावा, असे त्‍यांनी सांगितले. सद्य:स्थितीत प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com