पितृपक्षात पिंडाला कावळा शिवणे झाले कठिण!

पितृपक्षात पिंडाला कावळा शिवणे झाले कठिण!

Published on

पितृपक्षात पिंडाला कावळा शिवणे झाले कठीण!
संख्या घटल्‍याने विधी करण्यात अडथळे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : सध्या सुरू असलेला पितृपक्ष हा आपल्या भारतीय परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा कालखंड मानला जातो. या काळात आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण, श्राद्ध व अन्नदान केले जाते. या विधींमध्ये कावळ्याला विशेष स्थान आहे. कारण आपल्या पितरांचा संदेशवाहक म्हणून कावळा मानला जातो. पितृपक्षात पूर्वजांच्या आठवणी व त्यांच्या नैवेद्यासाठी तेवढ्यापुरतेच कावळ्यांचे स्मरण होत असल्यामुळे मानवी स्वार्थामुळे व बदलत्या वातावरणामुळे कावळ्यांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे पितृपक्षात कावळा मिळणे कठीण झाले आहे.
श्राद्धाच्या दिवशी शिजवलेले अन्न कावळा प्रथम ग्रहण करतो, त्यानंतरच पितरांना अन्न पोहोचल्याचे मानले जाते. हिंदू संस्कृतीत एखाद्या व्यक्तीच्या मरणोत्तर पिंडाला शिवून मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी कावळ्यांचे मोठे योगदान मानले जाते. सद्यस्थितीत पर्यावरणाच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम कावळ्यांवर झाला आहे. पितृपक्षात नैवेद्य खाण्यासाठी कावळ्याची प्रतीक्षा करत अखेर पूर्वजांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा लागत आहे. कावळ्यांची संख्या अशीच घटत राहिल्यास येणाऱ्या काळात पिंडदानाला शिवायलादेखील कावळा मिळणार की नाही, असे म्हटले जात आहे.
मध्यंतरीच्या काळात मोबाईल टॉवरमुळे चिमण्या नाहीशा होत असल्याची ओरड पर्यावरणप्रेमींकडून होत होती, मात्र बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत नव्या जगण्याची कला आत्मसात केल्याने आता चिमण्या परत दिसायला लागल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती कावळ्यांच्या बाबतीत निर्माण झाली आहे.
वातावरणातील बदलत्या परिस्थितीत जुळवून घेणारा एकमेव पक्षी म्हणून कावळ्याकडे पाहिले जाते. अंटार्टिका खंड वगळता जगभरात आढळणारा हा पक्षी असून, ३५ ते ४० वेगळ्या प्रजाती तर भारतात सहा प्रकारच्या प्रजाती कावळ्याच्या आढळतात.
उष्टे शिळे, खरकट्या अन्नावरसुद्धा हा बिनधास्त ताव मारून गुजराण करत असल्याने कावळ्याकडे पर्यावरणाचा सफाई कामगार म्हणून पाहिले जाते.
दरम्यान, पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा व औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रमाणाबाहेर वाढवलेला हा वापर पक्ष्यांच्या काही प्रजातींच्या मुळावर आलेला आहे.
त्या पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी हे पिकांवरील कीड नियंत्रणासाठी मोठी भूमिका बजावत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले मित्र समजून पक्षी संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे मत पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.
झाडांची फळे खाऊन त्यातील बिया आपल्या दृष्टीने ते इतरत्र पसरवितात. त्यामुळे एकप्रकारे अप्रत्यक्षपणे वृक्षलागवडीचे काम कावळ्यांसारख्या पक्ष्यांकडून होत असते. त्यामुळे पक्षी हे पर्यावरणाचे रक्षक म्हणून काम करतात.

पर्यावरणाची साखळी चालवण्यासाठी अत्यावश्यक
सद्यस्थितीत कावळ्याचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. नैसर्गिक स्वच्छतादूत असणारे कावळे पर्यावरणाची साखळी चालविण्यासाठी अत्यावश्यक आहेत. भारतीय संस्कृतीत कावळ्याला खूप महत्त्व आहे.

कावळ्यांना राहण्याची जागा कमी आहे. काहीही खाऊन जगू शकतात, पण त्यांना घरटे बांधायला उंच झाडे कमी झाली आहेत. तसेच अनेक जण उंदीर मारण्यासाठी विष टाकतात. मेलेला उंदीर खाऊन कावळा दगावतो किंवा विविध आजार होतात.
- डॉ. रीना देव, पशुवैद्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com