वसुरी- शेलपाडा - मलवाडा रस्त्याची दुरवस्था
विक्रमगड तालुक्यासह चिंचणी नाका डहाणू रस्त्याची दुरवस्था
नागरिक, वाहनचालकांना करावा लागतोय खडतर प्रवास, तातडीने दुरुस्तीची मागणी
विक्रमगड, ता. १७ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील ‘वसुरी-शेलपाडा-मलवाडा’ मार्गाची मोठी दुरवस्था झाल्याने नागरिक, वाहनचालकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चिंचणी नाका ते डहाणू मार्गावर दिवसभर छोट्या-मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते, परंतु सध्या याच मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले असून, या मार्गावरून खड्डा चुकवून पुढील प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास सदर रस्त्यावरील खड्डे सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळत आहे. परिणामी, या मार्गाने पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही खड्ड्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
पाली-विक्रमगड मुख्य मार्गालगत असलेला वसुरी-शेलपाडा-मलवाडा हा मार्ग अनेक गाव -पाड्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे, मात्र या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून नागरिकांना, वाहनचालकांना वाहने चालविणे धोक्याचे बनले आहे. वसुरी-शेलपाडा-मलवाडा हा ९ किमी तालुक्यातील महत्त्वाचा अंतर्गत रस्ता असून, या मार्गांवर १५ ते २० पाडे तसेच वसुरी, उटावली, शेलपाडा, मलवाडा ही गावे आहेत. या मार्गांवर अनेक छोटे-मोठे फार्महाउस, रिसॉर्ट असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असते, मात्र या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने या रस्त्यावरून वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे. तसेच चिंचणी डहाणू या मुख्य रस्त्या शेजारील सहा जी. प. शाळांमधील विद्यार्थ्यांनाही चाळण झालेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याचा फटका सहन करावा लागत आहे. वाहनचालकांसह नागरिक व विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घ्यावे, अशी मागणी आहे.
कोट
वसुरी-शेलपाडा-मलवाडा रस्ता दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव पालघर कार्यकारी अभियंता यांना पाठविला जाईल. तसेच खड्डे पडल्याने रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात येईल.
- मनोज अंभोरे, उपअभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग, विक्रमगड
कोट
वसुरी-उटावली-शेलपाडा-मलवाडा या नऊ किमी रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला आहे. या मार्गावरून प्रवास करणे खूपच धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती हाती घेणे गरजेचे आहे.
-प्रमोद देसले,
(सामाजिक कार्यकर्ते, विक्रमगड)
कोट
गेल्याच वर्षी चिंचणी नाका ते डहाणू या मुख्य रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली व काही महिन्यांतच निकृष्ट दर्जाचा रस्ता बांधल्याने तो पूर्णपणे उघडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी.
- विशाल माच्छी, स्थानिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.