पलावा पुलावरील एक लेन बंद
पलावा पुलावरील एक लेन बंद
दांडिया महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुरुस्तीचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ ः नवीन पलावा उड्डाणपुलावर खड्डे पडून दुरवस्था झाल्याने त्यावर मास्टिक अस्फाल्ट टाकण्यात येत आहे. या कामासाठी पुलावरील एक लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सोमवार (ता. २१)पासून नवरात्रोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू होत असून, डोंबिवलीत भव्य दोन दांडिया महोत्सव होतात. या उत्सवांना बडे नेतेमंडळी, सेलिब्रिटी शहरात कल्याण शिळ मार्गाने येत असतात. अशातच या पुलाची दुरुस्ती येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत. पावसाने उघडीप दिल्यास काम तीन दिवसांत संपवण्याचा मानस असल्याचे सांगण्यात येत आहे.
कल्याण शिळ रस्त्यावरील पलावा उड्डाणपूल हा जुलै महिन्यातच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता, मात्र या रस्त्याचे काम नीट न झाल्याने त्यावर लगेच खड्डे पडण्यास सुरुवात झाली. सातत्याने सुरू असलेल्या पावसाने उद्घाटनानंतर काही दिवसांतच पुलाची पार चाळण झाली. यावरून विरोधी पक्ष मनसेचे नेते राजू पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि सत्ताधारी पक्षातील मित्रपक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेनेचे आमदार राजेश मोरे आणि एमएसआरडीसी प्रशासनावर टीकेची झोड उठवली, परंतु पावसाची रिपरिप सुरूच असल्याने प्रशासनाला पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेता येत नव्हते.
अखेर १५ ऑगस्टपासून एमएसआरडीसी प्रशासनाने या पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. डांबरीकरण करून त्यावर मास्टिक अस्फाल्टचा थर चढविण्यात येत आहे. १९० मीटर रस्त्यावर मास्टिक अस्फाल्टचा थर चढवला आहे, तर ६७५ मीटर अंतरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. साधारण ७०० मीटरचा हा पूल असून, त्यावरील एका पूर्ण लेनचे मास्टिक अस्फाल्ट टाकून डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती येथील कंत्राटदाराने सांगितली. पावसाने अशीच उघडीप दिल्यास येत्या तीन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येईल, असेही कंत्राटदाराने सांगितले.
कोंडीत भर पडणार
सोमवारपासून नवरात्रोत्सव सर्वत्र सुरू होत आहे. येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाला सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळी ही कल्याण-शिळ रस्त्यानेच प्रवास करणार आहेत. या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी अरुंद रस्ते असल्याने होणारी वाहन कोंडी पाहता नवरात्रोत्सवात या कोंडीत भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जुन्या पुलावर वाहनांच्या रांगा
नवीन पलावा पुलावरील एका लेनचे काम सुरू असल्याने केवळ एकच लेन वाहतुकीसाठी खुली आहे. त्यामुळे जुन्या पलावा पुलावर नेहमीप्रमाणे वाहनांच्या रांगा लागणार आहेत. त्यातच काटई चौकात यामुळे कोंडीत भर पडणार आहे. नवरात्रोत्सवात कल्याण-शिळ रस्त्यावर वाहनांच्या संख्येत भर पडणार असून, या वेळी वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांचा कस लागणार आहे.
आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता दांडिया महोत्सवांना अनेक नेतेमंडळी उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. या वेळी नेतेमंडळींचे येणारे ताफे आणि सामान्य नागरिकांची यामुळे होणारी कोंडी याला वाहतूक पोलिसांना तोंड द्यावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.