ठाण्याच्या मातीमध्ये पुन्हा फुलणार आमराई
पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : पूर्वी घोडबंदर रोड परिसरामधील गावांमध्ये आंब्याच्या बागा (आमराई) होत्या. त्या बागाच आता राहिल्या नसल्याने आंब्याचा गोडवा चाखण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. तो गोडवा नव्या पिढीला अनुभवता यावा, यासाठी ठाणे महापालिका काही ठिकाणी आमराई फुलविण्यासाठी कामाला लागली आहे. महापालिकेच्या शहर विकास विभागामार्फत किमान पाच एकर असलेल्या मोकळ्या जागांच्या शोधात आहे. त्यामुळे लवकरच ठाणे महापालिकेमार्फत ठाण्यात आमराई निर्माण केली जाईल आणि पुन्हा एकदा ठाण्याच्या मातीमधील आंब्यांची गोड चव आगामी पिढीला चाखण्यास मिळेल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ठाणेकर असलेले आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ओक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील आंबा आणि त्याच्या चवीचा गोडवा सांगताना, तो पुन्हा चाखता यावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत ठाण्याला पुन्हा आमराईचे वैभव मिळावे, असे म्हणणे मांडले होते. ती बाब उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मनावर घेत, ठाण्याच्या मातीतील आंब्याचा गोडवा सर्वांना अनुभवता यावा आणि जुने आमराईचे वैभव निर्माण करता येईल का, असा प्रस्ताव तत्काळ ठाणे महापालिका प्रशासनासमोर मांडला. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने संबंधित विभागाला उपमुख्यमंत्री शिंदे यांची संकल्पना सांगून कामाला लागण्याचे आदेश दिले.
उद्यान विभागाने सुरुवातीला मुल्लाबाग येथे आमराई फुलविण्याचा निर्णय घेतला; पण तेथे असलेल्या मोठ्या वृक्षवल्लींमुळे तेथे आमराई फुलवणे अशक्य वाटू लागले. याचदरम्यान पालिका प्रशासनाने शहर विकास विभागाला किमान पाच एकर जागांचा शोध घेण्यास सांगितले. त्यानुसार जागा शोधमोहीम हाती घेतली गेली आहे. साधारणपणे महापालिका सहा ते सात ठिकाणी पहिल्या टप्प्यात आमराई तयार केली जाणार आहे. त्यामुळे नक्की ठाण्याच्या मातीतील आंब्याचा तो गोडवा अनुभवता येईल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.
कृषी विद्यापीठाची मदत घेणार
आमराई तयार करण्यासाठी लागणाऱ्या आंब्याच्या प्रजाती या कोकणातील दापोली येथील कृषी विद्यापीठातून आणण्यात येणार आहेत. साधारणपणे सात ते आठ प्रजातींच्या आंब्याची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे ठाण्याला लवकरच एक नवीन ओळख मिळेल आणि पुन्हा एकदा जुने वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.
ठाणे शहरात आमराई फुलविण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना आहे. त्यानुसार पालिकेचा उद्यान विभाग आणि शहर विकास विभाग कामाला लागले आहे. जागा निश्चित झाल्यावर येत्या काही दिवसांत आंब्याच्या विविध प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने सात ते आठ प्रजातींच्या आंब्याचा गोडवा अनुभवता येईल. येत्या महिन्याभरात किंवा पंधरा दिवसांत खऱ्या अर्थाने प्रक्रिया सुरू होईल.
- मधुकर बोडके, उपायुक्त, उद्यान विभाग, ठाणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.