मेट्रो १२ च्या कामामुळे नेतीवली परिसर बनला अपघात क्षेत्र; आता टेम्पो पलटी
मेट्रो १२च्या कामामुळे नेतिवली परिसर बनला अपघात क्षेत्र; आता टेम्पो पलटी
कल्याण, ता. २१ (बातमीदार) : शहरात सुरू असलेल्या मेट्रो १२च्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. नेतिवली परिसर हा अपघात क्षेत्र बनला असून रविवारी (ता. २१) सकाळी एक मालवाहतूक करणारा टेम्पो येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात पलटी झाला होता. काही दिवसांपूर्वीच बसचा अपघातही नेतिवली परिसरात झाला होता. याबाबत स्थानिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
नेतिवली परिसरात मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. धोक्याचा इशारा देणारे रेडियम नसल्याने बसचालकाला अंदाज आला नाही आणि अपघात झाला होता. या कामकाजात हलगर्जी होत असल्याचा आरोप स्थानिक हरेश इंगळे यांनी केला असून त्यांनी वाहतूक व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. टेम्पो पलटी झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती; मात्र या मुख्य चौकात वाहतूक पोलिसच नसल्याचे हे त्यांनी आपल्या फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सांगितले आहे. अखेर नागरिकांनीच एकत्रितपणे टेम्पो सरळ करून त्यात पुन्हा माल भरला आणि वाहतूक पूर्ववत केली.
वाहतूक व्यवस्थेविरोधात उपोषण
नेतिवली परिसरात पत्री पूल निर्माणाधीन असताना जवळपास पाच वर्षे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. तर आता मेट्रोच्या कामामुळे नेतिवली परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. विकासकामे होत असली तरीही वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याचे परिसरातील रहिवासी हरेश इंगळे म्हणाले. यासंदर्भात बुधवारी (ता. २४) पासून चक्कीनाका वाहतूक उपविभागीय कार्यालय परिसरात उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.