नवरात्रीचा उत्सव आणि नेतीवलीच्या जय भवानी नगरात चाळींना नाल्याचे स्वरूप
नेतीवलीतील चाळींना नाल्याचे स्वरूप
सांडपाण्याचा निचराच होईनाः प्रशासनाचे दुर्लक्ष
कल्याण, ता. २२ (बातमीदार) : नेतीवली पोलिस चौकीमागील जय भवानी नगर परिसरातील चाळींना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पावसानंतर चाळीत हे पाणी साचून राहात असून, नागरिकांच्या घरात शिरते. ठेकेदाराकडून नालेसफाई झाली नसल्याची तक्रार येथील नागरिक करीत असून, अद्यापही पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष गेलेले दिसत नाही.
प्रभाग क्रमांक ४४, नेतीवली टेकडी परिसरातील जय भवानी चाळीतील ही समस्या असून, येथे असंख्य कुटुंब वास्तव्य करीत आहेत. मागील तीन दिवसांपासून येथील चाळींमध्ये सांडपाणी साचून राहिल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे परिसरातील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक हतबल झाले आहेत.
नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, सर्वत्र भवानी मातेचा जागर सुरू आहे, मात्र नेतीवलीच्या जय भवानी नगरमध्ये परिस्थिती भीषण असून, घाणीचे पाणी चाळीतच साचून आहे. घराबाहेर पाऊल ठेवणेही नागरिकांना अवघड बनले असून, याच अस्वच्छ सांडपाण्यातून वाट काढावी लागते. दरम्यान, नेतीवली परिसरातील नाल्यांची नियमितपणे सफाई व्हावी, पावसाळ्यापूर्वी नाल्यात अडकलेला गाळ व सर्व कचरा स्वच्छ केला जावा. सर्व तांत्रिक अडचणी सोडवल्या जाव्यात, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.
साचलेल्या पाण्यात सापांची पिल्ले
पाण्यात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधीदेखील पसरली आहे. इतकेच नव्हे तर या साचलेल्या पाण्यातून सापांची पिल्लेदेखील घरापर्यंत पोहोचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरवर्षी नालेसफाई अभावी तुंबलेल्या नाल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यांत असा त्रास सहन करावा लागत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
निवडणुकीत भूमिका घ्यावी लागेल
महापालिका नागरिकांकडून कर घेते व त्याबदल्यात अशा सुविधा देत आहे का? ठेकेदाराला काम दिल्यानंतर कामाची पाहणी अधिकारी का करीत नाहीत, असा सवाल येथील स्थानिक रहिवासी हरेश इंगळे यांनी उपस्थित केलेला आहे. इतकेच नव्हे तर राजकीय नेते निवडणुकीनंतर आमच्या समस्यांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असाही रोष व्यक्त केला जात आहे.
लहान मुलांनी खेळायचे कुठे?
जय भवानी नगर परिसरात असंख्य लहान मुले आहेत. घराच्या आवारातच ही लहान मुले खेळतात, मात्र दाराबाहेर साचलेले घाणीचे पाणी असल्याने ऐन सुट्टीच्या दिवशीही या चिमुरड्यांना घरातच बसून राहावे लागते. अगोदरच मैदानांचा अभाव त्यात आता घराबाहेरही निघता येत नसल्याने त्यांचा प्रचंड हिरमोड होतो. सतत या पाण्याशी संपर्क आल्याने त्वचेचे आजार जडण्याची शक्यता असल्याने कुटुंबीयदेखील त्यांना शाळेत जाण्याव्यतिरिक्त घराबाहेर पडू देत नाहीत.
नेतीवली परिसरात नालेसफाई करण्यात आली होती. येथील नागरिकांच्या हिताचा विचार प्रशासन नेहमीच करते, मात्र परिसरातील नागरिक जेवणातील खरकटे व इतर प्लॅस्टिक कचरा नाल्यात फेकून देतात. हाच कचरा अडकून राहिल्याने पाण्याचा निचरा होत नाही. तक्रारीनंतर आम्ही दोन तासांतच नाल्यांची सफाई करून अडकलेले प्लॅस्टिक बाहेर काढले आहे. यानंतर साचलेले पाणी निघून गेले. नागरिकांनी नाल्यात कचरा न फेकल्यास अशी समस्या उद्भवणार नाही.
- उदय निकुंभ (स्वच्छता अधिकारी, ४/जे प्रभाग क्षेत्र)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.