रखडलेल्‍या ‘गारगाई’ ला येणार वेग

रखडलेल्‍या ‘गारगाई’ ला येणार वेग

Published on

रखडलेल्‍या ‘गारगाई’ला येणार वेग
दोन महिन्यांत निविदा काढा, मंत्री आशीष शेलार यांचे पालिकेला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबईकरांना भविष्यात ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देणाऱ्या गारगाई धरणाचे काम मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मार्गी लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या हालचालींना वेग आहे. दोन महिन्यांत निविदा काढा, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सांस्‍कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी दिले आहेत.
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येनुसार वाढलेली पाण्याची गरज, अनेक भागांत जाणवत असलेला पाण्याचा तुटवडा या पार्श्वभूमीवर आज (ता. २२) मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत मंत्री आशीष शेलार यांनी पालिका मुख्यालयात जाऊन बैठक घेतली.  प्रकल्प कामांचा आढावा घेतला. या प्रकल्पाला राज्य सरकारकडून परवानग्या आल्या असून, केंद्र सरकारच्या वनखात्याच्या काही परवानग्या बाकी आहेत. त्यामुळे याविषयी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव  यांच्याशी मंत्री आशीष शेलार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रकल्पासाठीच्या परवानग्या लवकर मिळाव्यात, अशी विनंतीही केली.
वनीकरणासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, वेगाने हा प्रकल्प राबविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासाठी पालिका आणि सरकारची लगबग सुरू झाली आहे. मुंबईची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून, पालिका निवडणुकीच्या आधी प्रकल्प मार्गी लागल्यास सत्ताधारी महायुतीला प्रचारासाठी चांगला मुद्दाही ठरण्याची शक्यता आहे.

परवानग्यांना विलंब
पालिकेने २०२० मध्ये गारगाई प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या प्राथमिक अभियांत्रिकीची कामे अंतिम टप्प्यात असून, तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या  बहुतांश परवानग्या प्राप्त झाल्या आहेत, मात्र केंद्र  सरकारच्या वन विभागाची आणि वन्यजीव विभागाकडून अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने हा प्रस्ताव रखडला होता. या धरणातून मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी दररोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.

३६.५१ कोटींची तरतूद
पालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ३६.५१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढत आहे. वाढती मागणी व पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी पालिकेकडून गारगाई प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पाच्या प्राथमिक अभियांत्रिकीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तसेच तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या बहतांश परवानग्या प्राप्त झाल्या असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार
प्रकल्पात बाधित होणाऱ्या सुमारे तीन लाख झाडांच्या बदल्यात चंद्रपूरमध्ये तीन लाख झाडे लावण्यात येणार आहेत. बाधितांचे पुनर्वसन करून कुटुंबातील एकाला नोकरी दिली जाणार आहे. हा प्रकल्प वेळेत परवानगी मिळाल्यास तीन ते साडेतीन वर्षांत पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईच्या अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी मिळावे यासाठी ४४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देणाऱ्या गारगाई धरणाच्या कामाच्या निविदा येत्या दोन महिन्यांत काढण्यास पालिका आयुक्तांना सांगितले आहे. हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
- आशीष शेलार, मंत्री

मुंबईची तहान भागवणाऱ्या गारगाई प्रकल्पाला तातडीने केंद्राची परवानगी मिळायला हवी होती, मात्र मुंबईबाबत सापत्नभावाची वागणूक केंद्र सरकार सतत देत आहे. राज्य सरकारही मुंबईतील प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. गारगाईसारख्या प्रकल्पांची परवानगी घेण्यात महायुती सरकारची दिरंगाई झाली असून, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर श्रेयासाठी ते पुढाकार घेतील, हे दुर्दैव आहे.
- सुरेशचंद्र राजहंस,
प्रवक्ते, काँग्रेस

केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार आहे. तुम्ही या प्रकल्पाला परवानगी घ्यायला हवी होती. २०१४ पासून सरकारमध्ये तुम्हीच आहात. मग परवानग्या का मिळत नाहीत. विलंब झाल्याने प्रकल्पाच्या किमती वाढताहेत. जनतेच्या पैशांचा अपव्यय होतोय.
-किशोरी पेडणेकर,
माजी महापौर, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com