भिवंडी-वाडा महामार्गाची दुरवस्था

भिवंडी-वाडा महामार्गाची दुरवस्था

Published on

वज्रेश्वरी, ता. २३ (बातमीदार) : भिवंडी-वाडा महामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिकांनी ३० सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमोद गुरुनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली अंबाडी नाक्यावर उपोषण करणार आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघात झाले आहेत. काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. ठोस कारवाई न झाल्यास प्राणाची आहुती देण्यास तयार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
आंदोलनाच्या समितीमध्ये सुनील लोणे, कल्पेश जाधव, ॲड. असगर पटेल, रूपेश जाधव, भूषण घोडविंदे, नवनाथ भोये, नीलेश चव्हाण, मुकेश पाटील, सुशांत चौधरी, महेश ठाकरे, सतीश जाधव यांचा समावेश आहे. प्रमोद पवार यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात रस्त्याच्या दुरवस्थेचे गंभीर परिणाम आणि कथित भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे. हा महामार्ग बीओटी तत्त्वावर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बांधला असला, तरी देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पाळलेली नाही. २०१९ मध्ये नागरिकांच्या आंदोलनामुळे टोल नाका बंद झाला, तरी रस्ता सुधारला नाही.
विशेषतः जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीवर गंभीर आरोप आहेत. ३१ ऑगस्ट २०२३ मध्ये रस्त्याच्या दुरवस्थेमुळे २२ वर्षीय आकाश जाधवचा मृत्यू झाला. याबाबत कंपनीच्या संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. ६ ऑगस्ट २०२४ मध्ये याच कंपनीला ४० कोटींचे नवीन काँक्रीट पॅच काम देण्यात आले. ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ८०३ कोटींचे कामही वाढीव दराने दिल्याचा दावा पवार यांनी केला आहे.

विविध समस्या
भिवंडी-वाडा रस्त्याच्या दुरवस्थेवर नागरिकांचा रोष मोठा आहे. अशा रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा माल बाजारात पोहोचत नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होते. रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत, तर अनेक तरुणांचा मृत्यू किंवा अपंगत्व झाले आहे.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या
* रस्त्याची तत्काळ दुरुस्ती
* नव्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करणे
* भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई
* गुणवत्ता तपासणी
* श्वेतपत्रिका जारी करणे

--------------
अन्याय सहन करणार नाही
भिवंडी-वाडा रस्ता दैनंदिन जीवनाचा कणा आहे. तो आमच्या पिढ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. ठेकेदार कोट्यवधी रुपये घेऊन लोकांचे जीव धोक्यात टाकत आहेत. कारवाई नाही; आता आम्ही मरायला तयार आहोत; पण हा अन्याय सहन करणार नाही, प्रमोद पवार यांनी सांगितले.

नागरिकांचा पाठिंबा
स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते या उपोषणाला पाठिंबा दर्शवत आहेत. हा महामार्ग ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, त्याच्या दुरवस्थेमुळे लाखो नागरिकांचे जीवन प्रभावित झाले आहे. आता सर्वांचे लक्ष जिल्हा प्रशासन आणि सरकारच्या कारवाईकडे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com