पावसामुळे गरबा रसिकांचा हिरमोड

पावसामुळे गरबा रसिकांचा हिरमोड

Published on

पावसामुळे गरबा रसिकांचा हिरमोड
काही ठिकाणी मंडळांनी उभारले मंडप

कल्याण, ता. २३ (बातमीदार) : नवरात्रोत्सवाची सुरुवात सोमवारी (ता. २२) झाली आहे; मात्र सध्या अनेक ठिकाणी पावसामुळे नवरात्रोत्सवाच्या तयारीला व प्रत्यक्ष कार्यक्रमांना मोठा फटका बसला आहे. शहरातील विविध भागांमध्ये संततधार पावसामुळे मंडप उभारणी, देवीची मूर्ती बसवणे, आरास सजावट, गरबा व सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यांवर परिणाम झाला आहे. पावसामुळे मंडपात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी पूजा व कार्यक्रमांना व्यत्यय आला होता. पावसामुळे आलेल्या अडचणी लक्षात घेता अनेक ठिकाणी पहिल्याच दिवशी कार्यक्रम रद्द केले असून तर काही ठिकाणी नियोजनानुसार कार्यक्रम घेण्यात आले. अनेक दिवसांपासून रासरंग खेळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या गरबा- दांडिया रसिकांचा पावसामुळे मोठा हिरमोड झाला आहे.

कल्याण-डोंबिवलीत यंदा सहा हजारांहून अधिक ठिकाणी देवीमातेचा उत्सव साजरा केला जात आहे. यात सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळेदेखील असून काही मंडळांनी पावसाची शक्यता लक्षात घेत मंडप घातले आहेत. यामुळे कितीही पाऊस असला तरी गरबा रसिकांना न भिजता रास गरब्याचा आनंद लुटता येतो. तर मंडप नसलेल्या ठिकाणी पावसामुळे गरबा रसिकांनी पाठ फिरवली. दोन्ही शहरांत अनेक ठिकाणी भव्य रासरंग गरबा दांडिया आयोजित केले जात असून पावसामुळे त्याही ठिकाणी अल्प प्रमाणात प्रतिसाद दिसून आला.

दुर्गाडी देवीसारख्या प्रसिद्ध देवस्थानांतील उत्सवावर आणि भक्तांच्या येण्या-जाण्यावरही पावसाचा परिणाम पहिल्याच दिवशी जाणवला. पावसामुळे धार्मिक वातावरणात थोडीशी निराशा असली, तरी भक्तजन प्रार्थना करून उत्साह टिकवून आहेत; मात्र दिवसभर विश्रांती घेतलेला पाऊस नेमका संध्याकाळी येत असल्याने गरबा रसिकदेखील हवालदिल झाले आहेत. कल्याण पूर्व छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीतील श्री शनेश्वर मित्र मंडळाचे यंदाचे २५वे वर्ष असल्याने त्यांनी भव्यदिव्य असा मंडप उभारला असून आकर्षक सजावट व रोषणाई केली आहे. पावसाची संपूर्ण शक्यता आधीच लक्षात घेतली गेल्याने न भिजता गरबा रसिकांना आनंद लुटता येत असल्याचे या वेळी मंडळाचे पदाधिकारी अर्जुन सोनावणे म्हणाले.


बहुप्रतीक्षित नवत्रोत्सवात विविध ठिकाणी स्पर्धा आयोजित होतात. पावसामुळे गरबा खेळण्यात व्यत्यय येतोच, शिवाय गरबा रसिक पावसामुळे पाठही फिरवतात. यंदा पावसामुळे कल्याण-डोंबिवलीकरांचा हिरमोड होत असला तरी निसर्गाला आपण अडवू शकत नाही.
- अक्षय मेस्त्री, गरबा रसिक, कल्याण

सप्टेंबरमध्ये नवरात्रोत्सव असल्याने पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही अगोदरच तसे नियोजन केले होते. गरबा रसिकांना व्यत्यय नको म्हणून आम्ही लांबलचक छत तयार करून घेतले आहे. कितीही पाऊस झाला तरीही शेकडो गरबाप्रेमी खेळू शकतात.
- अर्जुन सोनावणे, श्री शनेश्वर मित्र मंडळ

फोटो : श्री शनेश्वर मित्र मंडळाने पावसापासून बचाव करणारा मंडप उभारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com