शून्य शिक्षकी शाळांचे संकट

शून्य शिक्षकी शाळांचे संकट

Published on

निखिल मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २३ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामधील मराठी माध्यमाच्या ४०४ शिक्षकांच्या पालघर जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. त्यातच विकल्प दिलेले २२१ शिक्षकही बदली करून जिल्हा सोडून गेले आहेत. यामुळे जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता जाणवत असून, आठ तालुके मिळून ३० ते ४० जिल्हा परिषदेच्या शाळा शून्य शिक्षकी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी शिक्षण विभागावर शून्य शिक्षकी शाळांचे नव्याने संकट उभे राहिले आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये २०१७ पासून शिक्षकांची अनेक पदे रिक्त होती. आदिवासी जिल्हा असतानाही ४० टक्क्यांच्या जवळपासची पदे रिक्त होती. त्यातच जिल्ह्याबाहेर बदली करून जाणाऱ्या शिक्षकांनी बदलीसाठी प्रस्ताव दिले होते. हे शिक्षक जिल्हा बदली करून गेले, तर शून्य शिक्षकी शाळा निर्माण होणार होत्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार होता. या पार्श्वभूमीवर कोणताही शिक्षक जिल्हा बदलीने जिल्हा बाहेर सोडू नये, असा ठरावच पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभागृहाने एकमताने घेतला होता. त्यानंतर शिक्षक जिल्हा बाहेर जाऊ नये, म्हणून उच्च न्यायालयात दाखल याचिकेत बदलीला स्थगिती होती. त्यामुळे आतापर्यंत कोणीही शिक्षक जिल्हा बाहेर गेलेले नव्हते. परिणामी काही महिने शैक्षणिक संकट टळले होते.

जिल्ह्याबाहेर बदली होत नसल्याने ७०० ते एक हजार शिक्षकांनी एकत्रितरित्या उच्च न्यायालयात या प्रकाराला आव्हान दिले. उच्च न्यायालयाने या याचिकेमध्ये निकाल देताना मानवी मूल्यांचा विचार करून शिक्षकांना बदली देण्यात यावी, असे निर्देश सरकारला दिले. त्यातच बदलीसाठी स्थगिती असलेली याचिका माघारी घेण्यात आली. यामुळे शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा झाला. या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेने केली.

कार्यमुक्तीनंतर ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बदली पात्र शिक्षक कार्यरत होते, त्या शाळा रिक्त झाल्या. काही शाळांमध्ये एक, तर काही शाळांमध्ये दोन शिक्षक कार्यरत होते. यापैकी एक शिक्षकी शाळेचे शिक्षक बदलीने जिल्ह्याबाहेर गेल्यामुळे ती शाळा शून्य शिक्षकी होणार आहेत. ज्या शाळेवर दोन शिक्षक होते, ती शाळा एक शिक्षकी राहणार आहे. अर्थात या प्रकारामुळे जिल्ह्यात ३० ते ४० शाळा शून्य शिक्षकी, तर त्याहून अधिक शाळा एक शिक्षकी होण्याची चिन्हे आहेत.

विद्यार्थ्यांच्या नुकसानीची भीती
पेसा कायद्यांतर्गत, तसेच कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरल्याचे शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले असले तरी एकास एक शिक्षक असे प्रमाण नसल्याने शून्य शिक्षकी शाळांवर शिक्षकांचे नियोजन करताना शिक्षण विभागाची चांगलीच दमछाक होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची शक्यताही वाढत आहे. त्यातच शून्य शिक्षकी शाळा असलेल्या शाळांवर कार्यरत असलेल्या तालुक्याच्या शिक्षकांचीही बदली झाली आहे. त्यामुळे शून्य शिक्षकी शाळा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाची दमछाक
शून्य शिक्षकी शाळा राहू नये, यासाठी जिल्हा परिषद नियोजन करत आहे, मात्र इकडचे शिक्षक तिकडे पाठवण्यात नियोजनाची चांगलीच कसरत होताना दिसत आहे. त्यातच तालुकानिहाय बदली झालेल्या बदलीपात्र शिक्षकांना बदलीचे आदेश आले आहेत. त्यांना अजूनही शाळेतून सोडण्यात आलेले नाही. शून्य शिक्षकी आणि एक शिक्षकी शाळांची स्थिती समजून घेऊन त्या दृष्टीने नियोजन सुरू असले तरी या प्रकारामुळे अधिकारीवर्गासह कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

शून्य शिक्षकी शाळा होणार आहेत, हे नाकारता येणार नाही, मात्र शाळा शून्य शिक्षकी होऊ नये आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरळीत सुरू राहावे, या दृष्टीने परिपूर्ण नियोजन केले आहे. पेसा आणि कंत्राटी शिक्षक यांचेही नियोजन सुरू आहे.
- सोनाली मातेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, पालघर जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com