वसईमध्ये दहिसर टोलनाका!
भाईंदर, ता. २४ (बातमीदार) : दहिसर टोलनाका स्थलांतराच्या जागेवरून एकीकडे वाद निर्माण झालेला असतानाच हा टोलनाका वसई खाडीपुलापलीकडे वसई विरार महापालिकेच्या हद्दीत स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. त्याला मान्यता मिळण्यासाठी स्थलांतराचा प्रस्ताव महामंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवला आहे. यासंदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली आहे.
दहिसर टोलनाक्यावरील कोंडी लक्षात घेऊन तो स्थलांतर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार परिवहनमंत्री सरनाईक यांनी पाहणी करून स्थलांतरासाठी दोन ते तीन जागा सुचवल्या होत्या. त्यात वसई खाडीवरील वरसावे पुलाजवळ मिरा-भाईंदरच्या हद्दीतील ठिकाणाचा समावेश होता, मात्र या जागेवर स्थलांतराला घोडबंदरवासीयांनी विरोध केला आहे. तसेच वनमंत्री गणेश नाईक यांनीदेखील विरोधाला पाठिंबा दिला आहे.
स्थलांतराची जागा संजय गांधी उद्यानात येत असल्याने त्या ठिकाणी टोलनाका बांधायला वन विभागाकडून परवानगी दिली जाणार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले होते. या वादामुळे टोलनाका कोणत्या ठिकाणी स्थलांतर होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता राज्य रस्ते विकास महामंडळाने टोलनाका वरसावे खाडीपुलापलीकडे वसई-विरार पालिकेच्या हद्दीत स्थलांतराचा निर्णय घेतला आहे; मात्र ही जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात असल्याने त्याला प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानुसार त्याचा प्रस्ताव महामंडळाने प्राधिकरणाकडे पाठवला आहे.
दिल्लीतील मुख्यालयाची परवानगी आवश्यक
दहिसर टोलनाक्याजवळ प्रचंड कोंडी होत असून, या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. त्याचा प्रवाशांना व स्थानिकांना मोठा त्रास होतो. उपमुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी टोलनाका स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा टोलनाका वरसावे येथील खाडीपुलापलीकडे स्थलांतर करण्यात येणार आहे, असा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाला दिला आहे. हे स्थलांतराचे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकक्षेत असल्याने प्राधिकरणाच्या दिल्लीतील मुख्यालयाची परवानगी आवश्यक आहे. या प्रस्तावाला तांत्रिक सूचना व शिफारस देऊन प्रस्ताव मुख्यालयाला पाठवावा, अशी विनंती महामंडळाने प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे केली आहे.
मिरा-भाईंदरकरांची कोंडीतून मुक्तता
परिवहनमंत्री सरनाईक यांनी या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. टोलनाका स्थलांतरामुळे मिरा-भाईंदरच्या नागरिकांना टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीतून कायमची मुक्तता मिळणार आहे. त्यामुळे टोलनाका स्थलांतराच्या प्रस्तावासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी विनंती सरनाईक यांनी गडकरी यांना केली आहे.
दहिसर टोलनाका सध्याच्या ठिकाणापासून चार किमी अंतरावर वरसावे खाडीपुलाच्या पलीकडे वसई-विरार पालिकेच्या हद्दीत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे. या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.